विनापरवाना चिखलीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन : आयोजकांवर गुन्हा दाखल
शासनाची परवानगी न घेता पाटीलनगर चिखली येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले. याप्रकरणी आयोजकांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू नेवाळे, सारंग मोरे, दीपक साने, रवींद्र जाधव आणि अन्य 10 ते 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई बाजीराव चौधर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बैलगाडा शर्यतीच्या अयोजनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2021 रोजी निकाल दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडा शर्यतीचे आयोजन) नियम 2017 मध्ये दिलेल्या नियमानुसार बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे आरोपींनी पालन केले नाही. लोकांची गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेतला बैलगाडा शर्यत आयोजित केली. पाटीलनगर चिखली येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटात ही शर्यत बुधवारी (दि. 2) सकाळी घेण्यात आली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्याम मस्के तपास करीत आहेत.