पहिल्याच दिवशी ‘पेट’मध्ये तांत्रिक गोंधळ, परीक्षा एक तास उशिरा, प्रश्नांचीही पुनरावृत्ती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन पीएच.डी. पात्रता परीक्षेमध्ये (पेट) पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ उडाला. सकाळी दहा वाजताचा पेपर तांत्रिक अडचणींमुळे एक तास उशिरा सुरू झाला. ५० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेत पाच प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याने पेपर जमा करताना केवळ ४५ प्रश्न सोडवल्याचे दिसत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंदा ‘पेट’साठी सर्वाधिक ४ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यामध्ये सर्वाधिक २ हजार ३४ अर्ज विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी केले आहेत. या उमेदवारांची परीक्षा ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रांवर सुरू झाली. मात्र, या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. सकाळी १० ची परीक्षा असल्याने विद्यार्थी केंद्रावर गेले. मात्र सकाळी अकरा वाजता परीक्षा सुरू झाली. परीक्षा ५० प्रश्नांची होती. मात्र, पाच प्रश्नांची पुनरावृत्ती होती. त्यामुळे विद्यार्थी गोंधळले. आता गुण वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रश्नपत्रिकेतील चुका
प्रश्नपत्रिकेत अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे. तसेच अनेक प्रश्नांमध्ये पर्याय दिले नव्हते. असे काही प्रश्न होते ज्यांचे योग्य उत्तर दिले गेले नाही. प्रश्नपत्रिकेत ५ प्रश्नांची पुनरावृत्ती होत असल्याच्या तक्रारी हिंदी विषयाच्या काही परीक्षार्थींनी केल्या आहेत. गुरुवारी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या मानव्यशास्त्र व विद्याशाखेच्या ३० विषयांसाठी पेट परीक्षा होत आहे. पहिल्या दिवसाच्या चुकांमधून विद्यापीठ काय धडा घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांकडून कुलगुरूंची भेट
पेटमधील गैरप्रकारांमुळे संतप्त विद्यार्थ्यांचा मुद्दा घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची भेट घेतली. परीक्षेत तांत्रिक अडचणी येत असल्याचे शिष्टमंडळाने कुलगुरूंना सांगितले. उमेदवाराच्या लॉगिनवरही त्याला त्याच्या विषयाऐवजी दुसऱ्या विषयाची प्रश्नपत्रिका दाखवली जात होती, असे सांगण्यात आले. यावेळी अभाविपचे महानगर मंत्री प्रतीक मेश्राम उपस्थित होते.