महामोर्चाला परवानगी याचे आश्चर्य नाही ः शरद पवार
साताराः महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाली याचं आश्चर्य वाटत नाही. कारण गुरुवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगीबाबत संकेत दिले होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्नेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांनाच अधिकार या मुख्यंमत्री शिंदे यांच्या वक्तव्याची शरद पवार यांनी आठवण करुन दिली.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी मोर्चाबाबतची आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, लोकांच्या मनात मोर्चाबाबत राग आणि औत्सुकत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत जबाबदार लोकांनी आक्षेपार्ह विधाने केली. सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी ही विधाने आहेत. त्याचा राग उद्या मोर्चात दिसेल.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचा उच्चार केला. कोश्यारी यांच्यासंर्दभात केंद्र सरकारला निर्णय घ्यावाच लागेल. केंद्राला मौन बाळगता येणार नाही. त्यामुळे कोश्यारी यांच्याबाबतचा निर्णय लवकरच दिसेल, असे शरद पवार यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने आल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी मांडलेल्या भूमिकेचे शरद पवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, उदयनराजे यांनी भूमिका मांडल्याचे समाधान आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हाकलपट्टी करा, महापुरुषांचा अपमान थांबवा यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे. भायखळा ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. त्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपातंर होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे होतील.
या परवानगीवरुन गेले दोन दिवस चांगलेच राजकीय नाट्य रंगले. महाविकास आघाडीने महामोर्चाची जय्यत तयारी केली. गावागावातून कार्यकर्ते आणण्याचे नियोजन केले. मात्र ऐनवेळी पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. महाविकास आघाडीने लगेच पत्रकार परिषद घेतली व मोर्चा निघणारच असे जाहीर केले. त्यानंतर अवघ्या काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला आडकाठी करणार नाही, अशी भूमिका मांडली. लोकशाहीत प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने जे जे शक्य आहे ते आम्ही करू, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोर्चाचा मार्ग मोकळा केला आणि अवघ्या काही तासातच मोर्चाला पोलिसांची लेखी परवानगी मिळाली.