‘गाढवानं गाढवासारखा निकाल दिला’; ठाकरे गटाचा नार्वेकरांना खोचक टोला
मुंबई | शिवसेना अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिला आहे. यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची ठाकरे गटाची याचिका फेटाळली, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची शिंदे गटाची याचिकाही फेटाळून लावली आहे. तसेच खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच असल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्ष केलं आहे.
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी निकालावर परखड टीका केली आहे. हा निकाल नार्वेकरांनी एवढा चांगला दिला की त्याचा आदर्श घ्यावा. नार्वेकरांना तर मी म्हणतो देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनवावं. म्हणजे देशातले चांगले चांगले निकाल नार्वेकर देतील. गाढवानं गाढवासारखाच निकाल दिला आहे. हे अपेक्षितच होतं. आता पुढची रणनीती पक्षप्रमुख ठरवतील, असं नितीन देशमुख म्हणाले.
हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या दोन तासांचा ब्लॉक
ठाकरे गटाचे भवितव्य काय? असा सवाल केला असता. ते म्हणाले, या निकालाचा आणि भवितव्याचा काही संबंध नाही. उद्धव ठाकरेंचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. पण राहुल नार्वेकरांचं भवितव्य खराब आहे. कारण निवडणुकीतच खरं भवितव्य समोर येईल. ६-७ महिने निवडणुकीला बाकी आहेत. या निवडणुकीत हे ४० आमदार तुम्हाला कुठेच दिसणार नाही. एकनाथ शिंदेंनी सभागृहात म्हटलं होतं की ४० पैकी एकही आमदार पडला, तर मी शेतात काम करायला जाईन. त्या शब्दावर त्यांनी ठाम राहावं.
सुरुवातीपासून पक्षप्रमुखच महाराष्ट्रात पक्षाच्या सभा घेत आले आहेत. या ४० लोकांनी कधी पक्षासाठी सभा घेतल्या नाहीत. एकनाथ शिंदे कधी विदर्भात प्रचाराला आले नाहीत. पक्षासाठी जिवाचं रान उद्धव ठाकरेंनी, आदित्य ठाकरेंनी, बाळासाहेब ठाकरेंनी केलं. महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी, आमच्यासाठी पक्षही ठाकरे, चिन्हही ठाकरे आणि नेतृत्वही ठाकरेच, असंही नितीन देशमुख म्हणाले.