राहुल गांधींच्या हेरगिरीच्या वृत्ताने काँग्रेस भडकली, अमित शहांना गृहमंत्री हटवण्याची मागणी
नवी दिल्ली: भारतातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश आणि उद्योगपती यांच्यावर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवून फोन हॅक करण्यात आल्याची बाब गंभीर आहे. फोन टॅपिंग केली जात असल्याच्या मुद्द्यावरून देशभर खळबळ उडाली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोन टॅप करून त्यांची हेरगिरी केल्याचं वृत्त आल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणीच काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार लोकशाही विरोधी आहे, असं सांगतानाच भाजपने आता आपलं नाव बदलून भारतीय जासूस पार्टी ठेवायला हवं, अशी खोचक टीकाही सुरजेवाला यांनी केली आहे.
इस्त्रायलमधील सॉफ्टवेअर एजन्सीने आमचे सॉफ्टवेअर फक्त सरकारलाच विकत असल्याचे स्पष्ट केले आहे. खाजगी लोकांना नाही. जर खाजगी लोकांना विकण्यात आले नाही, तर केंद्र सरकारच्या कुठल्या एजन्सीने देशातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश, उद्योगपती यांचे फोन हॅक करुन पाळत ठेवली? असा सवाल नवाब मलिक यांनी केला. तसेच, केंद्र सरकारच्या माहितीसाठी हे करण्यात आले असेल, तर कुठल्या अधिकार्याने किंवा एजन्सीने फोन हॅक करुन पाळत ठेवली. याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे, असे नवाब मलिक म्हणाले.
यावेळी काँग्रेसने राहुल गांधींची हेरगिरी केल्याचा भाजपवर आरोप केला. केवळ राहुल गांधीच नव्हे तर इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही हेरगिरी करण्यात आली आहे. राहुल गांधी, त्यांचा स्टाफ एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने त्यांचे केंद्रीय मंत्री, पत्रकार आणि कार्यकर्त्यांची हेरगिरी केली. हे अतिरेकीपणाचं लक्षण नाही का?, असा सवाल सुरजेवाला यांनी केला. सुरजेवाला आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हेरगिरीचं प्रकरण पुढे आल्याने गृहमंत्री अमित शहा यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. शहा यांना गृहमंत्रीपदावरून बरखास्त केलं जावं, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.