“भारत बंद’ला राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा; जयंत पाटील यांनी परभणीत दिली माहिती
परभणी – संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने घोषित केलेल्या भारत बंद”ला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असून येत्या सोमवारी २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या भारत बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
देशभरातील १०० पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला खासदार फौजिया खान उपस्थित होत्या. जयंत पाटील यांनी काल परभणीत घेतलेल्या जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांना या बंद च्या सहभागाबद्दल माहिती दिली.या आढावा बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे,खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे, बाबजानी दुरराणी, राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) गटाने पुकारलेल्या २७ सप्टेंबरच्या ‘भारत बंद’मध्ये सुमारे १०० राष्ट्रीय राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, कामगार संघटना, शिक्षक, महिला, युवक, मजूर आणि इतर सहभागी होतील. एटक राष्ट्रीय कार्यसमितिचे सदस्य डॉ.भालचंद्र कांगो यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटांच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी पार पडलेल्या या बैठकीत १०० संघटनांच्या २०० हून अधिक नेत्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप-आरएसएस राजवटीच्या दिवाळखोर धोरणांविरोधात शेतकरी, कामगारांचे प्रश्न आणि ‘भारत बंद’चे महत्त्व, आदी विषयांवर महत्त्वपुर्ण चर्चा करण्यात आली, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे यांनी दिली.
या बैठकीत राज्यातील आणि इतर सर्व संघटनेतील समर्थकांची जमवाजमव आणि महाराष्ट्रात ‘भारत बंद’ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. एका शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली.या शिष्टमंडळाने पुढील सोमवारच्या देशव्यापी कारवाईसाठी महाविकास आघाडी पक्षांना पाठिंबा दर्शवला.