अनिल देशमुखांवरील ‘ईडी’च्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया…
![NCP's first reaction to ED's action against Anil Deshmukh; Said](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Jayant-Patil-on-Anil-Dehsmukh-ED.jpg)
मुंबई |
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानावर ईडीने छापे टाकले असून कारवाई सुरु आहे. शुक्रवारी सकाळी ईडीच्या एका पथकाने अनिल देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. दरम्यान दुसरीकडे एका पथकाने मुंबईतील वरळीमधील सुखदा इमारतीतील निवासस्थानावर छापा टाकला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीत काही सापडत नाही म्हणून त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहे. १० वर्षांपूर्वीचं प्रकरणं बाहेर काढून त्यावरुन एफआयआर दाखल करायचा आणि छापेमारी करायची याचाच अनुभव सर्वांना येत आहे. मोठे आकडे टाकून भ्रष्टाचाराचे आरोप करायचे ही पद्दत आहे,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी, “ज्या व्यक्तीने आरोप केले आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर यात किती तथ्य असावं याचं उत्तर मिळतं,” असंही म्हटलं आहे.