मुंबई-पुणे महामार्गावरील टोल वाढीवरून राष्ट्रवादीची राज्य सरकारवर सडकून टीका
अधिवेशन संपताच गतीमान सरकारचा दरवाढीचा शॉक देण्याचा वेगवान निर्णय
मुंबई : महागाई, इंधनदर, गॅसची दरवाढ यामुळे सर्मसामान्यानंचे कंबरडे मोडले आहे. दिवसोंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला खर्चाची कात्री लागताना दिसत आहे. यातच आता मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवासही महागणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून द्रुतगती माग्रावर प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे, असं एमसआरडीकडून सांगण्यात आलं आहे. यावरून आता राष्ट्रवादी पक्षाने ट्वीट करत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच राज्यातील गतीमान सरकारने सुपरफास्ट गतीने दरवाढीचा सपाटा लावून महागाई वाढवणाऱ्या वेगवान निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्यात एक एप्रिलपासून वीज अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता असल्याने ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. एक एप्रिलपासूनच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे टोल दरात तब्बल १८ टकक्यांनी वाढ होणार असल्याने सर्वसामान्यांचा प्रवास महागणार आहे. तर आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांच्या किमतीमध्येही १ एप्रिलपासून १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांना जगणेही मुश्कील करायची तयारी सरकारने केलेली दिसते, अशी टीका राष्ट्रवादी पक्षाने केली आहे.
अर्थसंकल्पात वारेमाप घोषणांची खैरात करून अधिवेशन संपल्या संपल्या सर्वसामान्यांच्या खिशातच हात घालून त्यांचे खिसे रिकामे करायची सरकारची गतीमानता खरंच थक्क करणारी आहे. त्यामुळे सरकार गतीमान, दरवाढ वेगवान असे म्हणत महागाई झेलण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.