TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

‘राष्ट्रीय महामार्ग ४४’ वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा

नागपूर : पेंच ते खवासा हा राष्ट्रीय महामार्ग ४४ वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गावर महाराष्ट्राच्या बाजूने भरधाव वाहनाच्या धडकेत एका बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्यप्रदेशातील खवासा सीमेजवळ वाहनाच्या धडकेत मादी बिबट मृत्युमुखी पडला आहे. हा परिसर ‘ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून ओळखला जात असून वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी तो बांधण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही या महामार्गावर मृत्यू होत असल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

महाराष्ट्रातील तसेच मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगतचा हा राष्ट्रीय महामार्ग ४४ आहे. या महामार्गाच्या दोन्ही कडेला घनदाट जंगल असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली वन्यप्राण्यांचे मृत्यू थांबवण्यासाठी उपशमन योजना करण्यात आल्या. या उपशमन योजनांवर सुमारे ६०० ते ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, त्यानंतरही वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू सुरूच आहेत. जुन्याच पुलांना नवीन दाखवणे, नवीन बांधण्यात आलेल्या पुलाखाली कायम पाणी साचून राहणे या प्रकारांमुळे उपशमन योजनांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागपूर ते सिवनी महामार्गावर मनसरपासून रस्त्याच्या दोन्ही कडेला जंगल आहे.

या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी येथील वृक्षसंपदेवर कुऱ्हाड चालवण्यात आली. याविरोधात वन्यजीवप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली आणि तब्बल एक दशक या महामार्गाचे चौपदरीकरण रखडले. उपशमन योजनांच्या आश्वासनानंतरच चौपदरीकरणाला सुरुवात झाली. मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पापासून जाणाऱ्या ८.७ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे वन्यजीवांना अधिक धोका होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या भागात १३ उड्डाणपूल बांधून देण्याचे मान्य केले. ते बांधल्यानंतरही सातत्याने अपघात सुरूच आहेत. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला उपशमन योजनांच्या अभ्यासाचे काम देण्यात आले होते. मात्र, भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली येऊन वन्यप्राण्यांचे होणारे मृत्यू पाहता या उपशमन योजनांसाठीचा अभ्यास गांभिर्याने झाला का, याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे.

मृत्यूसत्र कायमच

या वर्षांच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये या महामार्गावर मनसर ते पवनीदरम्यान एका वाघाचा मृत्यू झाला. तर सप्टेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या बाजूने एका बिबटय़ाचा अपघाती मृत्यू झाला. आता मध्यप्रदेशातील खवासा सीमेवर एक मादी बिबटय़ाचा अपघाती मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी देवलापारजवळ वाहनाच्या धडकेत बिबट जखमी झाला. तर एका वाघाचा अपघात थोडक्यात वाचला.

सातत्याने होणाऱ्या अपघातातून आतातरी शिकले पाहिजे. कारण उपशमन योजना करूनही वन्यप्राण्यांचे अपघातसत्र सुरूच असेल तर नक्कीच कुठेतरी चुकलो आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा इत्यंभूत डाटा गोळा करुन त्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे.

-उदयन पाटील, सृष्टी पर्यावरण मंडळ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button