‘विरोधकांनी I.N.D.I.A चे तुकडे केले’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकास्त्र
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया म्हणजेच इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स नावाची आघाडी स्थापन केली आहे. दरम्यान, यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. विरोधकांनी I.N.D.I.A चे तुकडे केले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वीच तुम्ही यूपीएचे अंत्यविधी केले आहेत. शिष्टाचारानुसार मी तेव्हाच तुम्हाला सहानुभूती व्यक्त करायला हवी होती. पण उशीर झाला यात माझी चूक नाहीये. कारण तुम्ही स्वत:च एकीकडे यूपीएचे अंत्यविधी करत होतात आणि दुसरीकडे जल्लोषही करत होते. जल्लोष कशाचा? उजाड भिंतींवर नवीन प्लास्टर लावण्याचा. तुम्ही जल्लोष करत होता खराब यंत्रावर नवीन पेंट लावण्याचा. मला आश्चर्य वाटत होतं की ही आघाडी घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाणार आहात? मी विरोघकांना सांगेन की तुम्ही ज्यांच्या मागे चालत आहात, त्याला तर या देशाची भाषा, देशाच्या संस्कारांची समजच नाहीये.
अनेक पिढ्यांपासून हे लोक लाल मिर्ची आणि हिरव्या मिर्चीमधला फरक समजू शकत नाहीयेत. वेश बदलून दगा करणाऱ्यांचं सत्य समोर येतंच. ज्यांना फक्त नावाचाच आधार आहे, त्यांच्यासाठी म्हटलं गेलं आहे. दूर युद्ध से भागते, नाम रखा रणधीर, भाग्यचंद की आजतक सोयी है तकदीर. यांची समस्या ही आहे की स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी यांना एनडीएचाच आधार घ्यावा लागला आहे. पण सवयीनुसार गर्वाचा आय यांना सोडत नाही. त्यामुळे एनडीएमध्ये गर्वाचे दोन आय टाकले. पहिला आय २६ पक्षांचा गर्व, दुसरा आय एका कुटुंबाचा गर्व. एनडीएही चोरला आणि I.N.D.I.A चेही तुकडे केले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi takes on I.N.D.I.A. alliance; says, "Their trouble is such that they had to take the support of NDA to keep themselves alive. But, out of habit, the arrogance of 'I' doesn't leave them alone. That is why, they inserted two 'I's of arrogance… pic.twitter.com/3WP8SfXZ4i
— ANI (@ANI) August 10, 2023
विरोधकांचं नामप्रेम आजचं नाही, अनेक दशकांपासूनचं आहे. त्यांना वाटतं नाव बदलून देशावर राज्य करता येईल. गरिबाला चहूबाजूला त्यांचं नाव दिसतं, पण त्यांचं काम कुठे दिसत नाही. रुग्णालयात नावं त्यांची आहेत, पण उपचार नाहीत. शिक्षण संस्था, रस्ते, उद्याने, योजना, क्रीडा पुरस्कार, विमानतळे, संग्रहालये यांना त्यांची नावं आहेत. पण त्या योजनांमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. समाजाच्या शेवटच्या स्तरावर उभा व्यक्ती काम होताना पाहू इच्छितो. पण त्याला फक्त या कुटुंबाचं नाव मिळालं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
काँग्रेसशी जोडलेली कोणतीच गोष्ट त्यांची नाही. निवडणूक चिन्हापासून विचारांपर्यंत सर्वकाही काँग्रेस त्यांचं असल्याचा दावा करतेय. पण ते इतर कुणाकडून घेतलं गेलंय. आपल्या कमतरतांना झाकण्यासाठी निवडणूक चिन्ह व विचारही चोरले. पण तरी झालेल्या बदलांमध्ये पुन्हा पक्षाचा गर्वच दिसतो. २०१४पासून ते नकाराच्याच भूमिकेत आहेत. पक्षाचे संस्थापक ह्यूम विदेशी होते. १९२० मध्ये भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाला नवा ध्वज मिळाला, नवी ऊर्जा मिळाली. पण रातोरात काँग्रेसनं तो ध्वजही हिसकून घेतला. १९२० पासून हा खेळ चाललाय. मतदारांना भुलवण्यासाठी गांधी नावही त्यांनी चोरून घेतलं. काँग्रेसची निवडणूक चिन्ह दोन बैल, गाय-बछडा आणि नंतर हाताचा पंजा हे सगळे त्यांच्या वृत्तीलाच दाखवतं. सगळं एका परिवाराच्या हातात केंद्रीत झाल्याचंच हे दर्शवत आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.