काँग्रेसची विधानसभेच्या २८८ जागा लढण्याची तयारी सुरु; नाना पटोलेंचं मोठं विधान
मुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीर राजकीय नेते वेगवेगळी वक्तव्य करत असताना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची २८८ जागेवर लढण्याची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही सगळीकडं विधानसभेची तयारी चालू केली आहे. मी साकोलीचा आमदार आहे. त्यामुळं स्वाभाविक आहे, मला इथं यावं लागतं. इथल्या लोकांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. ते प्रश्न सोडवावे लागतात. पण, महाराष्ट्रामध्ये २८८ जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केलं आहे.
हेही वाचा – १८ व्या मिफ्फमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा अनुभव घेण्यासाठी पुणे सज्ज
दरम्यान, दुसरीकडे शिवसेठा ठाकरे गट देखील आगामी विधानसभा निवडणूक २८८ जागांवर लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वांना सूचित केलं आहे.