संगीत आहे तो पर्यंत पंडित भीमसेन जोशी यांचे नाव घेतले जाईल – शरद पवार
– भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगीतिक कार्यक्रमाचे उद्घाटन
पुणे | प्रतिनिधी
”पंडित भीमसेन जोशी हे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. राजकारणात असताना अनेकदा मराठी कानडी वाद समोर येतात. मात्र संगीतात हा वाद मिटवून मराठी आणि कानडीला एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी करून दाखवीली आहे. पंडितजींनी कायमच संगीताच्या माध्यमातून समाजाची सेवा केली आहे,” अशा भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केल्या. जोवर संगीतप्रेमी आहेत तोवर पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर या दोन भारतरत्नांचे नाव कायमच घेतले जाईल. त्यांचे स्वर कायमच लोकांच्या मनात राहतील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी ४ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून त्या निमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाने ‘अभिवादन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि. ६ व ७ फेब्रुवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे सुरु असून कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते.
या वेळी जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी डिझाईन केलेल्या विशेष ‘मोनोग्राम’चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, महापौर मुरलीधर मोहोळ, पंडितजींचे सुपुत्र व मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी उपस्थित होते.
मंत्री जावडेकर म्हणाले की, “पंडितजी म्हणजे संगीतातील अखेरचा शब्द. त्यांनी तानसेनांबरोबर कानसेनही घडविण्याचे काम केले. त्यांच्या रामबाग कॉलनीतील घराजवळ मी राहत असल्याने २-४ वेळा त्यांचा रियाज ऐकण्याचे भाग्य लाभले. त्या देशात कलेचा सन्मान होतो तो देश पुढे जातो.
उद्घाटन सोहळ्यानंतर पंडितजींचे ज्येष्ठ शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने पहिल्या सत्रातील सांगीतिक मैफलीची सुरुवात झाली. पंडित भीमसेन जोशी यांच्या आवडीच्या राग पुरीया या सायंकाळच्या रागाने त्यांनी गायनाला सुरूवात केली. त्यांना सचिन पावगी (तबला), उमेश पुरोहित (संवादिनी), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), देवव्रत भातखांडे, अनमोल थत्ते, तेजस देबू (तानपूरा), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.