ताज्या घडामोडीमुंबई

तापमान कमी झाल्यानंतरही मुंबईकर अस्वस्थ; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

मुंबई |  प्रतिनिधी 

मुंबईचे तापमान शुक्रवारी तुलनेने कमी होते. तरीही मुंबईकरांना कमालीची अस्वस्थता जाणवली. पंख्याच्या वाऱ्यानेही दिलासा दिला नाही. वातावरणात उष्णता साचून राहिल्याची जाणीव होत होती. यामुळे नोंदल्या गेलेल्या तापमानापेक्षा अधिक तापमान आजूबाजूला जाणवत असल्याचे मुंबईकरांनी सांगितले.

सांताक्रूझ येथे शुक्रवारी ३४.२, तर कुलाबा येथे ३३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गुरुवारीही सांताक्रूझ येथे ३४.४, तर कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले होते. मात्र गुरुवारी उकाड्याची तितकीशी जाणीव झाली नाही. २४ तासांमध्ये तापमान वाढले नसतानाही शुक्रवारी मुंबईकरांना अस्वस्थता जाणवली. ‘दोन्ही दिवशी संध्याकाळी ६० टक्क्यांहून अधिक आर्द्रता होती. मात्र मुंबईमध्ये गेले काही दिवस सातत्याने आर्द्रता जाणवत आहे. हवेमध्ये सातत्याने आर्द्रता असल्याने अधिक आर्द्रता सामावून घेतली जात नाही. त्यावेळी शरीरातून घाम बाहेर जाणेही कठीण होते. याचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक तापमानाची जाणीव होऊन अस्वस्थता वाढते,’ असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी स्पष्ट केले.

 

‘मुंबईमध्ये गेले काही दिवस अधिक आर्द्रता आहे. त्यामुळे तापमान गुरुवारी आणि शुक्रवारी समान असले, तरी वातावरणात साचून राहिलेल्या आर्द्रतेचा परिणाम हा घटक लक्षात घेणे आवश्यक आहे,’ असे त्या म्हणाल्या. मे महिन्यामध्ये आर्द्रतेमुळे मुंबईत प्रत्यक्ष असलेल्या तापमानापेक्षा अधिक तापमानाची जाणीव होते, असेही त्यांनी सांगितले. त्यासोबतच पश्चिमेकडून वाऱ्याची दिशा असल्याने या वाऱ्यासोबतही अधिक आर्द्रता शहरामध्ये आणली गेली. याचा संयुक्त परिणाम म्हणून शुक्रवारचे तापमान प्रत्यक्ष तापमानाहून अधिक जाणवले. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस मुंबईचा पारा ३५ अंशांच्या आसपास असू शकेल. तसेच दुपारनंतर आभाळ ढगाळ असेल, असेही सांगण्यात आले. पुढील आठवड्यात किमान तापमान किचिंत खाली उतरण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये आभाळ अंशतः ढगाळ असेल.

असे होते तापमान

मुंबईच्या विविध भागांमध्ये स्वयंचलित यंत्रणेवर झालेल्या नोंदीनुसार जुहू विमानतळ येथे ३२.८, चेंबूर येथील टाटा पॉवर येथे ३३.५, विद्याविहार येथे ३४.९, विक्रोळी येथे ३७.२, भायखळा येथे ३२.१, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३३.१, महालक्ष्मी येथे ३३.७, माटुंगा येथे ३३.४, सायन येथे ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button