‘तुम्ही जरांगे पुराण बंद करून सरकार पुराण सुरू करा’; वडेट्टीवार यांचा भुजबबळांवर जोरदार पलटवार

मुंबई : काल बीडमध्ये झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यामुळे छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे आमने सामने आले आहेत. वडेट्टीवार यांनीही भुजबळ यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. त्यांनी फक्त जरांगे पुराण लावलं आहे. जरांगे पुराण आता बस्स झालं. आता सरकार पुराणही सुरू करा. शेवटी सरकारनेच तो जीआर काढला आहे. त्यामुळे ओबीसींचं नुकसान झालं आहे. सरकारला कधी धारेवर धरणार? असा सवालच विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात काल बीडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार सभा झाली. या सभेवरही विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. कालच्या मोर्चात फक्त सत्ताधारीच पक्ष होता. सत्ताधारी पक्षाने मोर्चे काढायचे, आंदोलन करायचे, पण सरकारमध्ये बसून काहीच करायचं नाही? असा सवाल करतानाच जरांगे पुराण बस्स झालं. सरकार पुराण करा. सरकारनेच जीआर काढला. भुजबळांनी मला का टार्गेट केलं? मी त्यांचा दुश्मन नव्हतो. त्यांना विरोध केला नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
हेही वाचा – ‘कामठी-कोराडी-कन्हान विकासाला नवा आयाम मिळणार’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
भुजबळ यांना मी कधीच त्रास दिला नाही. त्यांच्या भूमिकेवरून मी कधी प्रश्न काढला नाही. भुजबळ मंत्रिमंडळात आहे. दोनदा जीआर निघाले. जीआरमध्ये आधी पात्र शब्द होता. त्यानंतर तो शब्द काढून नवा जीआर काढला. त्यामुळे हा जीआर रद्द करण्यासाठी लढाई असली पाहिजे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे, असा दावा कालच्या बीडच्या सभेतून करण्यात आला. त्यावरही वडेट्टीवार यांनी जोरदार हल्ला चढवला.
मला हे हस्यास्पद वाटतं. ते ओबीसीतून आरक्षण मागत आहेत, तर टार्गेट फडणवीस कसे असतील? हा जीआर काढताना त्यांच्या टार्गेटला हे बळी पडले का? त्यांचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला. त्याला मुख्यमंत्री बळी पडले का? सरकार झुकले का? सरकारने जीआर काढला त्याविरोधात बोलत नाही. जरांगे जरांगे सुरू आहे. जरांगेंनी तर आमचं वाटोळच केलंच. पण सरकारच्या जीआरचं काय? सरकार विरोधात कधी बोलणार? असा सवाल त्यांनी केला.





