घोडबंदर भागात पाणी टंचाईची समस्या लवकरच सुटेल ; पालिका प्रशासनाने दिले बैठकीत आश्वासन
![The problem of water scarcity in Ghodbunder area will be solved soon; The municipal administration gave an assurance in the meeting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/drinking-water.jpg)
घोडबंदर | घोडबंदर भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्याऐवजी ठाणे महापालिका टँकरमाफियांना पोसत असल्याचा आरोप करत याबाबत मुद्दा आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घोडबंदर भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरु असून ही समस्या लवकरच सुटेल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. तर, पाणी समस्या सुटली नाहीतर नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार केळकर यांनी प्रशासनाला बैठकीत दिला.
मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्ष लिटर वाढीव पाण्यापाठोपाठ भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी टप्प्याटप्प्याने ठाणे शहराला उपलब्ध होऊ लागले आहे. असे असले तरी नियोजन अभावामुळे घोडबंदर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. याबाबतचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. पाणी समस्येवर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर घोडबंदरच्या पाणी पुरवठ्याचा कृती आराखडा ठरविण्यासाठी महापालिकेत शुक्रवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार केळकर, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार तसेच घोडबंदर भागातील नागरिक उपस्थित होते. ज्या भागात पाणी टंचाईची समस्या आहे, त्याठिकाणी मुबलक पाणी कसे उपलब्ध होईल. त्यासाठी जलवाहीन्या टाकणे, अतिरिक्त पाणी पुरवठा करणे, अशा उपाययोजना करण्याचे काम सुरु असून हे काम लवकरच पुर्ण होऊन या भागातील पाणी समस्या सुटेल, असे आश्वासन प्रशासनाने बैठकीत दिले.