‘ते’ पत्र अत्यंत धक्कादायक, अनिल देशमुख यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
![I don't think this government will fall - Raj Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/raj-thackeray1-1.jpg)
मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, मुकेश अंबानी स्फोट प्रकरण, पूजा चव्हाण प्रकरण, तसेच वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकार हे बॅकफुटवर गेले आहे. वाझे प्रकरणावरून मुंबईत अनेक नाट्यमय घडामोडी होत आहेत. कालच वाझे यांना घटनास्थळी नेऊन एनआयएने घटनेची पुनःनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. यावरून एनआयएच्या हाती काही सबळ पुरावे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज या प्रकरणाला एकदम धक्कादायक अशी कलाटणी मिळाली आहे. सचिन वाझे प्रकरणावरून, पोलीस आयुक्त पदावरून गच्छंती केले गेलेले परमबीर सिंह यांनी, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
वाचा :-परमबीर सिंग यांचा आरोप खोटा; अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
यात त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर, गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या कृतीला मी नकार दर्शवल्याने, त्यांनी खोटी करणे देऊन, माझी बदली केली आहे, असंही परमबीर सिंह यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या ‘लेटर बॉम्ब’मुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विट करत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकीशीची देखील मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मुंबईचे माजी आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.” राज्यात गेल्या काही दिवसांपासून, विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे होत आहे.
आता यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याच्या चर्चांनी परत बाळसे धरले आहे. तसेच, आता या प्रकरणाशी संबंधित अजून काही मोठे खुलासे होण्याच्या शक्यतांना उधाण आले आहे.