निकालांचा महाराष्ट्रावर परिणाम नाही- आदित्य ठाकरे
मुंबई | उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील निकालांचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढत राहू, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर शिवसेना प्रथमच एवढया मोठया प्रमाणात इतर राज्यांमध्ये लढली असून असेच लढत राहू कधीतरी यश नक्कीच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेश, गोवासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय आणि शिवसेनेने बाहेरच्या राज्यांमध्ये प्रथमच लढल्यानंतर झालेला पराभव यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या पक्षांचे व नेत्यांचे अभिनंदन. त्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काम करावे. पाच राज्यांमधील निवडणुकीचा काहीही परिणाम महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही. आम्ही तिघे एकत्र आहोत व एकत्रितपणे लढत राहू, असे ठाकरे यांनी सांगितले.