मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक
मुंबईकर प्रवाशांना संपूर्ण दिवस प्रचंड हाल सोसावे लागले
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते बांद्रा स्थानकांदरम्यान मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक घेतल्यामुळे तब्बल ४२७ लोकल फेऱ्या प्रभावित झाल्या आहेत. यामध्ये २७७ लोकल फेऱ्या पूर्णत: रद्द करण्यात आल्या तर १५० फेऱ्या अंशत: रद्द केल्या गेल्या. परिणामी, शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी संपूर्ण दिवस मुंबईकर प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागले आहेत.
हा मेगाब्लॉक रविवारी सकाळी ८ वाजता संपणार असून त्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत होईल. मात्र, या कालावधीत पश्चिम उपनगरातील रेल्वे गाड्या २०-३० मिनिटे उशिराने धावत आहेत. धीम्या मार्गावरील गाड्या तात्पुरत्या जलद मार्गावर वळवण्यात आल्याने जलद मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे.
शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत घेतलेल्या ब्लॉकदरम्यान, १२७ लोकल फेऱ्या पूर्णत: रद्द करण्यात आल्या, तर ६० फेऱ्या अंशत: प्रभावित झाल्या. शनिवारी रात्रीपासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत १५० फेऱ्या पूर्णत: आणि ९० अंशतः रद्द झाल्या. यामुळे दादर, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवलीसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून प्रवास करावा लागला. वांद्रे ते माहीम दरम्यान धीम्या मार्ग बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले.
हेही वाचा : पुण्यातील पुष्प प्रदर्शनाची परंपरा युवकांनी जपावी; सुहास दिवसे
स्थानकांवरील गर्दीचा ताण –
ब्लॉकदरम्यान गाड्यांची संख्या कमी झाल्याने आणि गाड्या उशिराने धावत असल्यामुळे स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली. प्रवाशांनी उभ्याने प्रवास करत प्रचंड हाल सोसले. महिलांना आणि वयोवृद्ध प्रवाशांना बसण्यासाठी जागाही मिळाली नाही. तसेच प्रवासात उशीर झाल्यामुळे अनेकांनी कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यायी वाहनांचा वापर केला, ज्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला.
प्रवाशांच्या प्रतिक्रिया:
गाड्या वेळेत नसल्यामुळे मला शनिवारी कार्यालयात जाणाऱ्यांसाठी खूप उशीर झाला. जलद मार्गावरची गर्दी असह्य होती. गाडीत चढण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली.
रोशनी सावंत, बोरिवली
“रेल्वे प्रशासनाने कामासाठी वेळ चांगला निवडला असता तर बरे झाले असते. गर्दीमुळे गाडीत उभे राहायलाही जागा नव्हती. अशा स्थितीत प्रवास करणे फार कठीण आहे.”
– योगेश शेलार, मालाड
गाड्या रद्द झाल्यामुळे मला रिक्षाने प्रवास करावा लागला. खर्च खूप वाढला आणि वेळही वाया गेला. प्रशासनाने यापुढे अशा कामांसाठी पर्यायी व्यवस्था द्यावी. अन्यथा रात्रकालीन मेगाब्लॉक घ्यावा.
– पूर्वा देसाई, विद्यार्थी अंधेरी





