Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘ठाणे- भिवंडी-कल्याण भूमीगत मेट्रोसह नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबवा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  : भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या परिवहन सेवेच्या गरजा भागविण्यासाठी कल्याण – भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिवंडी शहरात वाढती लोकसंख्या, मालवाहतूकदारांची मोठी संख्या यामुळे कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याकरीता आणि शहराच्या सर्वांगीण, वेगवान पायाभूत विकासासाठी भूमीगत मेट्रोसह रस्ता रूंदीकरण व नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबविण्याचा निर्णय (दि. २७) ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक ५ च्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांमुळे भिवंडी शहराच्या विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पांसाठी शासन निधी उपलब्ध करून देईल. भिवंडी शहरात मेट्रोच्या कामासोबतच रस्ता रूंदीकरण प्रकल्पाचे कामही सुरू करण्यात यावे. भिवंडी शहरातील नागरिकांची या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होणार आहे, भिवंडीवासियांसाठी मेट्रो प्रमाणेच रस्ता रुंदीकरण प्रकल्पही महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचे काम सोबतच सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. रस्ता रूंदीकरण प्रकल्प राबविल्यामुळे भिवंडी शहरातील उत्तर भागाचा सर्वांगीण विकास होणार असून या भागातील नागरिकांचे दळण वळण गतीमान होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) राबविण्यात येत असलेल्या मेट्रो लाईन-५ या प्रकल्पांच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. विकसनशील शहरे आणि औद्योगिक केंद्रे यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक व रस्ते ही दोन्ही माध्यमे परस्परपूरक असून त्यांची अंमलबजावणी समांतर पद्धतीने केल्यास विकासाची गती वाढेल. नागरिकांना अधिक फायदेशीर सेवा मिळू शकणार आहे.

हेही वाचा –  ‘पानिपत शौर्य स्मारकासाठीचे भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात’; अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे

भिवंडी शहरातील दळणावळणाला गती येणार….

या प्रकल्पांमुळे भिवंडी शहरातील दळणावळणाला गती येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, या भागातील औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आता कल्याणच्या पुढे उल्हासनगरपर्यंत होत आहे. उल्हासनगरच्यापुढे अंबरनाथ जवळील चिखलोली उपनगरीय रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार करण्याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि आजूबाजूच्या परिसरातील लाखो रहिवाशांना मुंबई आणि ठाणे या प्रमुख शहरी केंद्रांपर्यंतचा प्रवास अधिक जलद होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशमध्ये भिवंडी हे मालवाहतूकीचे विकासकेंद्र होत आहे. या शहराच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. शहरातील पायाभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. शहरातील मेट्रो मार्गाच्या कामाबाबत आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही अंतर्भाव करण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. मेट्रोचे काम करताना ‘डिप टनेल’ तंत्रज्ञान वापरून बोगदा तयार करण्याच्या कामाची पडताळणी करावी. तसेच दुहेरी बोगदा तंत्रज्ञान वापरून रस्ता व मेट्रो मार्ग तयार करण्याच्या कामाचाही अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या  बैठकीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, भिवंडी निजामपूर महानगरपालिका आयुक्त अमोल सागर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सादरीकरण केले.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक ५ ठळक वैशिष्ट्ये…..

लांबी : एकूण 34.23 किमी. यात  मेट्रो मार्ग -५ टप्पा १ (11.90 किमी), मेट्रो मार्ग -५ टप्पा २ (10.5 किमी) आणि मेट्रो मार्ग -५अ  (11.83 किमी) यांचा समावेश आहे.

स्थानके :  १९ स्थानके  ( १ भूमिगत व उर्वरित उन्नत)

ट्रेनची रचना : 6 डब्यांची ट्रेन.

प्रस्तावित डेपो : काशेळी येथे (26.93 हेक्टर).

इंटरचेंज स्थानके: कल्याण  स्थानक  (मेट्रो मार्ग 12 सह) आणि कापूरबावडी (मेट्रो मार्ग  4 ).

प्रकल्पाची अंदाजित किंमत : मेट्रो मार्ग ५ : ८४१७ कोटी व  मेट्रो मार्ग ५ अ: ४०६३ कोटी

कामांची सद्यस्थिती व प्रकल्पातील टप्पे…..

टप्पा-I (कापूरबावडी – धामणकर नाका) साठी 96% काम पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाचे टप्पे :

– मेट्रो मार्ग -५ टप्पा १ (ठाणे – धामणकर नाका):

– लांबी: 11.90 किमी (6 उन्नत स्थानके).

– काम प्रगतीपथावर आहे आणि 96% स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत.

– सदर टप्पा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

– मेट्रो मार्ग -५ टप्पा २ (धामणकर नाका – दुर्गाडी):

– लांबी: अंदाजे 10.50 किमी.

– या टप्प्यात 6 स्थानके असून त्यात १ भूमिगत व ५ उन्नत स्थानके आहेत .

– सदर टप्प्यातील मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम करण्यात येत असून भूमी अधिग्रहण करण्यात येईल.

– मेट्रो मार्ग ५अ (दुर्गाडी ते कल्याण आणि उल्हासनगर जोडणी ):

– लांबी: 11.83 किमी. : यात दुर्गाडी ते कल्याण (6.557 किमी, 4 स्थानके) आणि उल्हासनगर जोडणी (5.272 किमी, 3 स्थानके) असे दोन कॉरिडॉर प्रस्तावित आहेत.

सदर टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम कार्यवाही सुरु आहे .

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button