ताज्या घडामोडीमुंबईविदर्भ विभाग

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी बोटीनं कोकण गाठणार

सागरी मार्गाच्या चाचण्या अंतिम टप्प्यात

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जलमार्गाने प्रवासाची मोठी सुविधा उपलब्ध होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. मुंबईहून मालवण, रत्नागिरी आणि विजयदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या ‘रो-रो’ बोट सेवेच्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून लवकरच या मार्गांवर प्रत्यक्ष सेवा सुरू होणार आहे.

राज्य सरकारच्या मत्स्य व बंदर विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली सागरी महामंडळ आणि एमटूएम कंपनी यांच्यातील करारानंतर ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलवर ही अत्याधुनिक रो-रो बोट दाखल झाली असून पहिल्या टप्प्यात मुंबई ते मांडवा दरम्यान यशस्वी चाचणी पार पडली आहे.

आता पुढील काही दिवसांत रो-रो बोटीच्या चाचण्या रत्नागिरी, विजयदुर्ग आणि मालवण या तीन प्रमुख बंदरांवर घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर बोट चालविण्याचा परवाना मिळेल आणि गणेशोत्सवाच्या आधीच नियमित सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – ‘राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर गुणवत्तापूर्ण बियाणे देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध ‘; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

प्रवाशांसोबत वाहनेही जलमार्गाने
ही बोट प्रवाशांसोबतच त्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहतुकही करणार असल्यामुळे प्रवाशांना कोकणात खासगी वाहन घेऊन जायला मोठा दिलासा मिळणार आहे. वाहनांसह जलमार्गे प्रवास केल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि रखडलेल्या रस्त्यांच्या समस्यांपासून सुटका होणार आहे.

उच्च क्षमता आणि आधुनिक सोयी-सुविधा
ग्रीसवरून ५५ कोटी रुपये खर्चून खरेदी केलेल्या या नव्या रो-रो बोटीत सुमारे ५०० प्रवासी आणि १५० वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे. आतापर्यंत धावत असलेल्या रो-रो बोटींपेक्षा ही बोट अधिक वेगवान असून, तिचा कमाल वेग ३० नॉटिकल माईल्स असून ती सुमारे २४ नॉटिकल माईल्सच्या सरासरी वेगाने धावणार आहे.

प्रवाशांना आरामदायक अनुभव
बोटीत वातानुकूलित विश्रांतीगृह, सुरक्षा सुविधा, शौचालय व्यवस्था, आपत्कालीन बचाव उपकरणे, सीसीटीव्ही, डिजिटल टिकीटिंग अशा सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. यामुळे दीर्घकालीन प्रवासातही प्रवाशांना आरामदायक अनुभव मिळणार आहे.

पावसाळ्यातही सेवा शक्य
रामदास बोटीच्या अपघातानंतर काही वर्षांपासून पावसाळ्यात फेरी बोटींना बंदी घालण्यात आली होती. मात्र नव्या रो-रो बोटीमुळे आता पावसाळ्यातही कोकणमार्गे जलवाहतूक शक्य झाली आहे. सागरी महामंडळाने यासाठी विशेष नियोजन केले असून हवामानानुसार सेवा राबवली जाणार आहे.

साडेचार तासांत कोकणात
मुंबईतील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलहून निघाल्यानंतर अवघ्या ३ तासांत रत्नागिरी तर साडेचार तासांत विजयदुर्ग आणि मालवण गाठता येणार आहे. त्यामुळे कोकणाचा प्रवास केवळ सोयीस्करच नव्हे तर वेळ वाचवणारा ठरणार आहे.

विशेष वैशिष्ट्ये (बॉक्स आयटम)
५०० प्रवासी + १५० वाहनांची क्षमता

२४ नॉटिकल माईल्स सरासरी वेग

सर्व हवामानात जलवाहतुकीसाठी सक्षम

गणेशोत्सवाच्या अगोदर सेवा सुरु होण्याची शक्यता

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button