Cyclone Tauktae : मुंबईला अतिवृष्टीचा इशारा
मुंबई – अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे वादळ पुढे गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागातील जिल्ह्यांत जोरदार वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून जम्बो कोविड सेंटरमधील ५८० रुग्णांना रात्रीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर ठाणे, रायगड आणि पालघरसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. शनिवारी सायंकाळी ताशी ३० ते ४० किलोमीटरने हे वादळ पुढे सरकत होते. हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे हे वादळ सध्या मुंबईच्या दक्षिणेला ४९० किमी अंतरावर असून १८ मे रोजी ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.





