#Coronavirus: मुंबईत आणखी २० जणांचा मृत्यू ; ४१७ नवे रुग्ण

मुंबई : करोनामुळे मुंबईत आणखी २० जणांचा बळी गेला आहे. या मृतांमध्ये १२ रुग्ण ४० ते ६० वयोगटांतील आहेत. चार रुग्णांना कोणताही आजार नव्हता. तर मुंबईत आणखी ४१७ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांचा एकूण आकडा ६८७४ वर गेला आहे. मुंबईत चोवीस तासांत ४१७ नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यात ३०७ रुग्णांचे अहवाल हे सरकारी रुग्णालयातील आहेत. तर ११० रुग्णांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेतून पालिकेला मिळाले आहेत.
मृतांची संख्या २९० वर गेली आहे. ४५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १४७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.धारावीत २५ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांचा आकडा ३६९ वर गेला आहे. आतापर्यंत धारावीतील १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर माहीममध्ये दोन आणखी रुग्ण सापडले असून एकूण आकडा ३५ वर गेला आहे. धारावीमध्ये पालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन खासगी रुग्णालयांनी करोनाच्या लढाईत सहभाग घेतला आहे. साई रुग्णालय, आयुष रुग्णालय, लाइफ केअर, फॅमिली केअर या रुग्णालयांनी तपासणी, उपचार सुरू केले आहेत.





