असे आंडू-पांडू खूप आले, संभाजी भिडेंवर संजय राऊत संतापले
मुंबई –
राज्यात होत असलेल्या लसीकरणावरुन केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांवर राऊत यांनी टीका केली. भारतीय जनता पक्षाचे एक विचारक आहेत, त्यांनी कोरोनाने मरणाऱ्या लोकांबद्दल अपशब्द वापरले आहेत. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आम्ही कोण आहोत, महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवलाय, अशा शब्दात राऊत यांनी संभीज भिडेंवर टीका केली. आतासुद्धा शिवसेना म्हणून, महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. तर, पळता भूई थोडी होईल, असे राऊत यांनी म्हटले.
कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्याच लायकीची नाहीत. कोरोना हा मूळात रोगच नाही. त्यामुळे त्यावरुन सुरु असलेला लॉकडाऊनचा बावळटपणा सरकारने बंद करावा, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. त्यानंतर, अनेकांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. आता, खासदार संजय राऊत यांनीही भिडेंवर टीका केलीय.
देशात सर्वत्र बावळट, नेभळट प्रजा असल्यामुळे कोरोनाचा आक्रोश सुरु आहे. लॉकडाऊनचीच गरज नाही. लोकांचे आरोग्य लोकांवर सोडून द्यावं, आणि सरकारने त्यांचा कारभार योग्य पद्धतीने करावा. दारु, मावा, मटका, चरस, गांजा सर्व मोकाट आणि एकत्र येऊन मुलांनी खेळायचे नाही, व्यायाम करायचा नाही हा महामुर्खपणा आहे. मास्क लावण्याने काहीही होत नाही. त्यामुळे मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. लष्करी जवानांना मास्क घालून लढायला सांगायचे का. जिथे मरण्यासाठी लढायचे आहे, तिथे मास्कची गरज नाही, असे भिडे म्हणाले





