मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींची निर्दोष सुटका!

7/11 Mumbai Local Blast | २००६ मध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज (२१ जुलै) ऐतिहासिक निकाल देत सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने ५ जणांना फाशीची शिक्षा आणि ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने अभियोजन पक्षाला पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचे सांगत सर्व १२ आरोपींना निर्दोष जाहीर केले.
११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये ११ मिनिटांच्या आत चर्चगेट ते बोरिवली दरम्यान पाच ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या भयानक दहशतवादी हल्ल्यात २०९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ८०० हून अधिक जण जखमी झाले होते. तपासादरम्यान असे समोर आले होते की, या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर केला होता, ज्यामध्ये आरडीएक्स, अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि खिळ्यांचा वापर करण्यात आला होता. पाकिस्तानस्थित ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेने हा कट रचल्याचे तपासात दिसून आले होते.
हेही वाचा : इराणमधील सर्वात मोठ्या ऑइल रिफायनरीला भीषण आग!
२००७ मध्ये या खटल्याची सुनावणी विशेष मकोका (MCOCA) न्यायालयात सुरू झाली होती. सप्टेंबर २०१५ मध्ये विशेष न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवले होते, त्यापैकी ५ जणांना फाशी आणि ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निकालाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते, तर राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेची पुष्टी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने अभियोजन पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांचे बयान अविश्वसनीय असल्याचे नमूद केले. विशेषत: साक्षीदारांच्या पहचान परेड आणि बम निर्मितीशी संबंधित पुराव्यांवर कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.





