चरित्र भूमिकेला ‘भारदस्त’पणा मिळवून देणाऱ्या अभिनेत्याला महाराष्ट्र मुकला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई । प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेता रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने “भारदस्तपणा” मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत ते भूमिका साकारत होते. ही त्यांची अखेरची मालिका ठरली.रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले होते. त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व, झुपकेदार मिशा आणि कडक आवाजाने त्यांच्या अनेज भूमिका गाजल्या. गावातील ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी भूमिका त्यांनी उत्कृष्टरित्या साकारल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती. आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते.
वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला व त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला व त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला.





