औरंगाबाद दंगलीमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/jayant-patil-.jpg)
- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप
मुंबई – औरंगाबाद दंगलीमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि काही पक्षाचे नेते, पुढारी या दंगलीचे पुढे होवून नेतृत्व करत होते. त्यामुळे एकंदरीतच प्रकार बघितला तर सरकारने या दंगलखोरांना नियंत्रित करण्याचा कोणताही पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न केला नाही. दंगलीवर नियंत्रण आणण्याचे पोलिसांचे प्रयत्न फारच अपुरे होते, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केला.
औरंगाबाद दंगल 2 वाजता दंगल उफाळून आली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पहाटे 4 वाजता आपल्याला फोन केला. दंगल सुरु आहे, परंतु पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. दगडफेक सुरु आहे मात्र पोलिस लांब उभे आहेत. कुणाचेही नियंत्रण नाही आणि जाळपोळ सुरु आहे असे कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितले. त्यावेळी तिथले पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी आपले फोनवर बोलणे झाले. आपण घटनास्थळी पोहोचत असल्याचे भारंबे यांनी सांगितले. एकंदरीतच सकाळी 9 वाजता दंगल आटोक्यात आली. पोलिसांची भूमिका फक्त बघ्याचीच होती. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वेळीच लक्ष घातले आणि त्यांनी प्रयत्न केल्यानंतर ही दंगल आटोक्यात आली. एकंदरीतच यामध्ये सरकारला दंगली व्हाव्यात अशा वाटतात की काय किंवा अशाप्रकारच्या दंगली झाल्या तरच आपल्याला राजकीयदृष्टया श्रेय मिळेल असा समजणारी मानसिकता आहे की काय अशी शंकाही जयंत पाटील यांनी उपस्थित केली.
मोदीसरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही
पाकिस्तानच्या साखरेचे स्वागत या देशात व्हायला लागले तर या देशातील ऊस उत्पादक शेतकरी नरेंद्र मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा जयंत पाटील यांनी पाकिस्तान साखर खरेदीवर केंद्र सरकारला दिला आहे. आज पाकिस्तानची साखर देशात यायला लागली, म्हणजे आपण पाकिस्तानची साखर या देशात पाहायला लागल्यामुळे तळपायाची आग महाराष्ट्र आणि देशातील शेतकऱ्यांची मस्तकाला पोचली आहे. सरकारने आम्हाला मदत केली नाही हे ठिक आहे, परंतु आता पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा नरेंद्र मोदींच्या सरकारने व्यक्त करायला सुरुवात केली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन जनतेला लुटले….
पेट्रोल आणि डिझेलची या देशामध्ये एवढी मोठी दरवाढ करण्याचा प्रयत्न झाल्यावर त्याचा दुष्परिणाम मतांवर दिसायला लागला आणि म्हणून भाजपने मागच्या 19-20 दिवसात कर्नाटकातील मतदानाकडे बघून दर वाढवून दिले नाहीत. याचा अर्थ भाजप दर नियंत्रणात ठेवू शकते आणि कमीही करु शकते. या देशातील जनतेची लूट पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन सरकारने केलेली आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला, मध्यमवर्गीयांना, शहरात राहणाऱ्या,ज्यांचं पगारावर घर आहे, अशांना फसवण्याचा कळस म्हणजे काल वाढलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आहे. निवडणूका झाल्या की भाजप कुणाचाच नसतो हे पुन्हा भाजपने सिध्द केले आहे, अशी टिकाही त्यांनी केली.