मुंबई गोळीबाराने हादरली ! कांदिवलीत दुचाकीवरुन आलेल्यांचा अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू
देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई गोळीबाराने हादरली आहे. कांदिवलीत रात्रीच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. अंतर्गत वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं आहे?
“कांदिवलीत रात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास आम्हाला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी काही लोकांवर गोळीबार केल्याची माहिती आम्हाला मिळाली. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. याप्रकरणी तपास सुरु आहे,” अशी माहिती झोन ११ चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिली आहे.
Maharashtra | At around 12:15 am, we got information that two people on a bike opened fire on some people in Mumbai's Kandivali police station area. One person died in the accident and 3 others were injured. Further investigation underway: Vishal Thakur, DCP Zone-11 pic.twitter.com/TmfmkCuDG9
— ANI (@ANI) October 1, 2022
जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय
जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गोळीबारात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याचं नाव अंकित यादव असल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार करणारे आणि पीडित एकमेकांना ओळखत होते असंही सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी एकूण चार गोळ्या झाडल्या.
आरोपी फरार
डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरुन आले होते. गोळीबार केल्यानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.