शरद पवारांकडून चुकीची माहिती दिली गेली; फडणवीसांचा पलटवार
मुंबई |
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे. भाजपा आणि परमबीर सिंग यांच्याकडून झालेले आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत पलटवार केला. फडणवीसांनी वेगवेगळी कागदपत्रे दाखवत शरद पवारांना योग्य ती माहिती दिली गेली नसल्याचा दावा केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी जप्त करण्यात आली. यात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. एटीएसनंही काहीजणांना अटक केली. यातच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसुलीचा आरोप केला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. पण, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सिंग यांचं दावे तथ्यहिन आहेत. कारण देशमुख त्यावेळी क्वारंटाइन होते,” असं फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “देशमुख विशेष विमानाने मुंबईत आले होते. पोलिसांकडे नोंदी घेतल्या जातात. यात १७ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी केलेल्या नोंदीनुसार अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर येणार असल्याची नोंद. त्यानंतर २४ फेब्रुवारीला ते ११ वाजता निवासस्थानापासून मंत्रालयात जाणार आणि येणार असल्याचं नमूद केलेलं आहे. देशमुख तिथे गेले की नाही मला माहिती नाही. पण, नमूद आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे सिंग यांनी जे पत्र लिहिलं आहे, त्यात मेसेजचा पुरावा दिला आहे. त्यात त्यांनी पाटील यांना बैठकीबद्दल विचारलेलं होतं. मला वाटतं शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेली नाही. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती बोलवून घेतली गेली. हे आता उघड झालं आहे,” असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
वाचा- पुढील काही वर्ष आपल्याला मास्क घालूनच फिरावं लागेल; तज्ज्ञांचा इशारा