तंत्रज्ञानाच्या गैरवापराच्या काळात नागरिकांची माध्यम साक्षरता आपल्याला ध्रुवीकरणापासून वाचवेल; माध्यम तज्ज्ञांचे मत
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त "वैज्ञानिक दृष्टिकोनासमोरील आव्हाने" या चर्चासत्र मध्ये झाले वैचारिक मंथन
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त २० ऑगस्ट रोजी साने गुरुजी स्मारक, पुणे येथे “वैज्ञानिक दृष्टीकोनासमोरील सध्याची आव्हाने” या विषयावर चर्चासत्र झाले. यात पत्रकार प्रसन्न जोशी हे समन्वयक होते तर अलका धुपकर (सहायक संपादक, TOI Plus), प्रतिक सिन्हा (संपादक,अल्ट न्यूज), आशिष दिक्षित (वरिष्ठ वृत्त संपादक, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस) यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. याच कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तीन मराठी पुस्तकांच्या हिंदी आवृत्त्या या पत्रकारांच्या वतीने प्रकाशित झाल्या.
‘सोचिए तो सही!’ (अनुवादक-निलेश झाल्टे आणि डॉ. धनंजय झाल्टे), ‘विचार से विवेक’ (अनुवादक डॉ. भाऊसाहेब नवले), ‘अंधश्रद्धा विनाशाय’ (अनुवादक विलास शेंडगे) यांनी यासाठी योगदान दिले. या अनुवाद प्रकल्पाचे प्रमुख संपादक हे डॉ. सुनीलकुमार लवटे तर समन्वय संपादक डॉ. चंदा सोनकर आणि सहायक संपादक डॉ गिरीश कशीद हे आहेत. या अनुवाद प्रकल्पामध्ये आतापर्यंत डॉ. दाभोलकर यांची एकूण १७ पुस्तके अनुवादित केली गेली आहेत आणि ती सर्व राजकमल प्रकाशन, दिल्ली तर्फे निर्मित आहेत.
प्रसन्न जोशी यांनी चर्चेला सुरुवात करताना आजच्या पत्रकारितेसमोरची आव्हाने कोणती त्यावर मांडणी केली. ते म्हणाले, फेक-न्यूज वरचा अंधविश्वास हे आजच्या काळातील प्रमुख आव्हान आहे. उजव्या शक्तींचा उदय झालेला असताना आपण कोणत्या जगात जगत आहोत हे समजून घेतलं पाहिजे. सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची आहे. ते AI, DEEP FAKE वापरतात. फेक न्युज एक समुदाय विशेष म्हणजे मुस्लिम, दलित विरोधात वापरले जातात. मग फेक न्यूज वर अंधश्रद्धा कशी पसरते यावर चर्चा झाली पाहिजे? फेक न्यूज येण्याचे प्रमाण उत्तर भारतात का जास्त आहे असा सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो. यासारखे अनेक विषय समोर ठेवून त्यांनी सहकारी पत्रकारांना बोलते केले.
आशिष दीक्षित म्हणाले, महाराष्ट्र, भारत आणि जगभरात जे होत आहे त्यात अनेक समान धागे आहेत. हे समजून घेणं आवश्यक आहे. समाजातील बऱ्याच पुराणमतवादी लोकांना डार्विन, वैज्ञानिक दृष्टिकोन मंजूर नव्हता. पण या लोकांना काही वर्षांपूर्वी सामाजिक, राजकीय अधिष्ठान नव्हते. पण आज यांचे धाडस वाढले आहे. एक केंद्रीय मंत्री म्हणतात की माकडापासून माणूस झालाच नाही. पृथ्वी सपाट आहे असं सांगितलं जातंय, हिंसेला प्रोत्साहन देणारी धर्मसंसद आयोजित केली जात आहे. आपल्या कुटुंबातील नातेवाईक अवैज्ञानिक आणि ध्रुवीकरणाला बळी का पडतात याचा विचार आपण का करत नाही? सोशल मीडियामुळे प्रत्येकाचे वास्तव वेगवेगळे तयार होते. त्यामुळे माणसं एकमेकांपासून दूर जात आहेत. ज्यामुळे ठराविक अवैज्ञानिक मते आपण सोशल मीडियावर सारखी पाहतो, त्याच खोट्या बातम्या आपल्याकडे नेहमी येत राहतात. ध्रुवीकरण हे उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूने होत राहते. प्रत्येक जण वास्तवाची वेगळी रूपे पाहतोय. काही चॅनल्सनी दिवस-रात्र सांगितलं की सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झालाय. त्यामुळे भारतातील बऱ्याच लोकांनी यावर विश्वास ठेवलाय. म्हणूनच लोकांच्या मनात एक अविश्वास निर्माण तयार झाला. वेळीच आपण संवाद साधायचा प्रयत्न केला पाहिजे. मोठ्या प्रमाणात फेक न्यूज उजव्या विचारधारा आणि राजकीय पक्षांकडूनच का येतात हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. संवाद आपण कुणाशी साधायचं हे आपल्याला ठरवावे लागेल. जे लोक रेटून खोटं बोलतात तिथे आपण ऊर्जा वाया घालवू नये. ज्या लोकांचे ब्रेनवॉश केलं गेलं आहे, त्यांच्याशी संवाद करायला हवा. मी माझ्या सर्व नातेवाईकांशी संवाद साधतो.
हेही वाचा – दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा मनसेला डिवचलं; म्हणाल्या..
अल्ट-न्यूजचे संस्थापक प्रतिक सिन्हा म्हणाले, आजकाल संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा करणे अवघड झाले आहे. प्रत्येक बाबतीत मुद्द्यांचे ध्रुवीकरण केले जाते. माहितीच्या व्यवस्थेचे तीन स्तंभ आहेत- त्यात माहिती तयार करणारे तंत्रज्ञ, ते प्रसारित करणारे प्लॅटफॉर्म्स आणि ग्रहण करणारे सर्व ग्राहक यांचा समावेश होतो. चुकीच्या माहितीवर लोक विश्वास कसे ठेवतात याचा अभ्यास व्हायला हवा. बरेच लोक चुकीच्या पोस्ट टाकतात किंवा व्हायरल करतात. हे प्रसारित होण्यामागे समाजमाध्यम कंपन्यांचे अल्गोरिदम तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मॉडेल कारणीभूत आहे. एका विशिष्ट समाजाच्या बाबतीत आणि भारतात मुस्लिम समाजाच्या बाबतीत tunnel vision संकल्पनेच्या जोरावर आपल्या मनात विषारी मते बनवली जातात आणि समाजात दुही, विद्वेष पसरवला जातो. समाज माध्यमांचा असा गैरवापर करून आणि एकच असत्य अनेक वेळा सांगून एक वेगळे नॅरेटिव्ह तयार केले जाते. त्यामुळेच माध्यम आणि तंत्रज्ञान साक्षरतेची आपल्या देशात नितांत गरज आहे. उजव्या शक्तीकडून निश्चितच जास्त फेक न्युज येण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. माहितीच्या दुष्प्रचाराने फक्त राजकीय आक्रमण होत नाही तर समाजाची पुनर्मांडणी त्यांना करायची आहे. त्यांच्या फेक न्युज मुळे समुदायावर आक्रमण होते. ही एक सुव्यवस्थित योजनेचा भाग आहे.
अलका धुपकर म्हणाल्या, जे पत्रकार सत्य बाजू मांडतात, ते सत्तेला आव्हान देणारी असतात. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांची बदली केली जाते, किंवा पत्रकारांना धमकी दिली जाते. कोव्हिड काळात जी औषधे मार्केटिंग तंत्रे वापरून विकली गेली त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. एक वाचक म्हणून तुम्ही कुठलं माध्यम वाचता, बघता हे सुद्धा जबाबदारीने पाहिलं पाहिजे. मासिक पाळी.बद्दल कॉर्पोरेट आणि सामाजिक संस्था बरेच काम करत आहेत. पण स्त्री आरोग्याच्या अनेक समस्यांबद्दल बुवा बाबांकडे पाठवले.जाते. डिजिटल साक्षरता नसल्यामुळे यासह अनेक समस्या झाल्या आहेत. डीप फेक, एआय समजून घेतलं पाहिजे. मग आपण sulli deals, bulli deals हे जे ऑनलाईन गुन्हे घडले ते सर्व थांबवू शकतो. आज परिस्थिती अशी झाली आहे की, शांतीस्वरूप भटनागर विज्ञान संशोधन पुरस्कार दोन वर्षांपासून दिला जात नाही, त्याचा पुनर्विचार सरकार करतंय. NCERT अभ्यासक्रमाचा चुकीच्या दिशेने पुनर्विचार झालाय. लैंगिक शिक्षण दिले जात नाही. पुराणातील सत्य ज्या प्रमाणात भारतात रुजवली जात आहेत तर ते आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. आज हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये खूप मोठी दरी आहे. देश भरात ‘मेरे घर आके देखो’ हे अभियान सुरू झाले आहे त्यात तुम्ही सहभागी व्हा.
अंनिस राज्य कार्यकारी समितीच्या सदस्य मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्तविक केले. त्या म्हणाल्या, गेल्या दहा वर्षांत वैज्ञानिक दृष्टिकोन चा प्रसार करण्यासाठी पत्रकारांसमोर कोणती आव्हाने आहेत हे पाहायला पाहिजे. प्रत्यक्षात आयुष्यात काय घडते आणि त्याचा आपल्या कामाशी काय संबंध आहे हे जाणून घेणे कार्यकर्त्यांसाठी आवश्यक आहे. माणूस स्वतःची बुद्धी वापरून जगणे कधीच थांबणार नाही. त्यामुळे हे तरुणच चळवळींचे बळ वाढवतात. डॉक्टरांच्या खटल्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सत्य शोधणे हे एकच मूल्य आहे.
अंनिस राज्य सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अरूण बुरांडे यांनी सूत्रसंचालन केले. परिवर्तनचे कार्यकर्ते राजू इनामदार यांनी सुरुवातीला “अभिवादन करून तुम्हा डॉ. दाभोलकर…” आणि शेवटी “आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो…” ही गाणी सादर केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग पुढील लिंक वर उपलब्ध आहे :