पुणे शहरातील रक्षकनगर परिसरात मध्यरात्री भीषण आग: १२ घरे जळून खाक; लाखो रुपयांचं नुकसान
पुणे : पुणे शहरातील रक्षकनगर परिसरात पहाटे ३ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. बिराजदार झोपडपट्टीला लागलेल्या या आगीत १२ ते १५ घरे जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेची माहिती स्थानिकांद्वारे अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या ५ गाड्यांसह जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेक कुटुंबांचं संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण परसलं होतं. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.दरम्यान, या आगीत आर्थिक नुकसान झालेल्या रहिवाशांनी सरकारकडे मदतीची मागणी केली असून संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने लवकरात लवकर मदत करण्यात मिळावी, असं या नागरिकांचं म्हणणं आहे.