औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळंके रस्त्यावरील मधुमती नदीला आलेल्या पुरामुळे रात्रीपासून अनेक गावाचा संपर्क तुटला
हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही कायम असल्याने नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळंके रस्त्यावरील मधुमती नदीला आलेल्या पुरामुळे रात्रीपासून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. परिणामी या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तसंच काही नागरिक पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून धोकादायक प्रवास करत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
एकीकडे जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. शेतातील पिके पावसाच्या पाण्याखाली बुडून गेली आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागणार होता, तर काही शेतकऱ्यांनी पेरलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेले आणि ज्या शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केली होती त्यांची पिके मुसळधार पावसामुळे उगवलीच नाहीत. अशा एक ना अनेक संकटाचा सामना यावर्षी शेतकऱ्यांना करावा लागत आहे.दरम्यान, अजूनही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तसंच ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नसून काळोख निर्माण झाला आहे.