‘सरकार भुजबळांची बाजू घेऊन मराठ्यांवर अन्याय करतंय’; मनोज जरांगे पाटील
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत मांडले. तसेच, मला गोळी मारली जाईल, असा गंभीर आरोपही छगन भुजबळ यांनी केला. दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, भुजबळांना कोणीही काहीही करणार नाही. परंतु, भुजबळ काहीही बोलत आहेत आणि सरकार त्यांची बाजू घेऊन मराठ्यांवर अन्याय करू लागलं आहे असं चित्र दिसतंय. अशीच प्रत्येक मराठ्याची भावना आहे. सरकार त्यांची एकट्याची बाजू घेत आहे आणि मराठ्यांवर अन्याय करत आहे. मी खूप जबाबदारीने शब्द वापरतोय. सध्या सरकार भुजबळांच्या दबावाखाली आहे.
हेही वाचा – अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी? टीमने दिले स्पष्टीकरण
आपलं राज्य सरकार भुजबळांच्या दबावात येतंय. तेदेखील हा दबाव निर्माण करत आहेत. कारण, त्यांना त्यांच्यावरील खटले रद्द करून घ्यायचे आहेत. भुजबळ मराठ्यांवर खोटे आरोप करून, सरकारची फसवणूक करून मराठ्यांवर अन्याय करू लागले आहेत. गावखेड्यात सरकारविषयी रोष पसरू लागला आहे. कारण सरकार भुजबळांची बाजू घेऊन मराठ्यांवर अन्याय करतंय. परंतु, आम्ही शांत बसणार नाही. सरकारने भुजबळांना उगाच बळ दिलं तर आम्ही आंदोलनाद्वारे सरकारला उत्तर देऊ, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सारथीप्रमाणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे ओबीसींनाही सवलती द्या, निधी द्या आणि जातींमध्ये समानता आणा, असं भुजबळ काल विधानसभेत म्हणाले. म्हणजे यांच्याकडे आरक्षण आहेच, यासह ते आमच्यासाठी असलेल्या ‘सारथी’लाही विरोध करणार, म्हणजे किती खालच्या दर्जाचा माणूस आहे आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.