मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना इशारा; म्हणाले, तुम्ही मराठ्यांना डिवचल्यावर..
मुंबई : मराठा आरक्षणासाठी जालन्यात आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठी मंत्री छगन भुजबळ यांना सूचक इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.
मनोज जरांगे म्हणाले, राज्यातील ओबीसी नेते जे आता मराठा आरक्षणाला विरोध करतायत, त्यांना मराठा समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं आहे. तुम्ही कधीतरी मराठ्यांच्या कामी याल म्हणून मराठ्यांनी छगन भुजबळांना मदत केली. आता आम्ही आरक्षण घ्यायची वेळ आली तर आम्हाला म्हणतात की ५० टक्क्यांच्या आत आरक्षण घेऊ देणार नाही. पण आम्ही ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण घेऊ.
माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. केवळ मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, असं माझं मत आहे. हे माझं एकट्याचं मत नाही. सगळेच जण याच मताचे आहेत. मी काही एकटा अशा मताचा नाही. परंतु, मला एकट्यालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही हे सगळ्यांच्या बाबतीत बोला. नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल हे लक्षात ठेवा, असं मनोज जरांगे म्हणाले.
हेही वाचा – ‘सहा महिन्यानंतर स्वाभिमानानं मंत्री म्हणून फिरणार’; भास्कर जाधव यांचा निर्धार
मी स्वतःहून भुजबळांवर टीका केली नाही. ते बोलले म्हणून मी बोललो. ते बोलले मराठ्यांना आरक्षण देऊ नका, म्हणून मी बोललो. मी कोणावरच आधी टीका करत नाही. मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नाही, इकडे घुसायचंच नाही, असं ते बोलले मग मी उत्तर दिलं. भुजबळ बोलण्याआधी मी काही बोललो का? माझं उपोषण सुटल्यापासून मी कधीच कोणावर ती व्यक्ती बोलण्याआधी बोललो नाही. आधी भुजबळ बोलले मग मी त्यावर माझं मत मांडलं. आम्ही काय गप्प बसणार का? आम्हाला डिवचल्यावर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही गप्प बसणार का? तुम्हीसुद्धा गप्प बसणार नाही. त्यामुळे तुम्ही मराठ्यांना का डिवचता? तुम्ही डिवचलं म्हणून आम्ही टीका केली. ते मराठा आरक्षणाविरोधात बोलले की सामान्य मराठा तुटून पडतो, असंही मनोज जरांगे म्हणाले.