अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षता व निमंत्रणाचे भाजप शहराध्यक्ष शंकर जगतापांनी घरोघरी केले वाटप
शंकर जगताप: ५०० वर्षानंतर प्रभू श्रीरामांच्या मंदिर स्थापनेचा सुवर्ण दिवस उगवला
![Mangal Akshata and invitations from Ayodhya were distributed house to house by BJP city president Shankar Jagtap](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/shankar-jagtap-780x470.jpg)
पिंपरी : अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीला चरणस्पर्श करून रामलला प्रतिष्ठानकडून आलेल्या पवित्र मंगल अक्षता आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांचे पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी घरोघरी जाऊन वाटप केले. हिंदू धर्मामध्ये तब्बल ५०० वर्षानंतर प्रभू श्रीरामांच्या मंदिर स्थापनेचा सुवर्ण दिवस उगवला आहे. येत्या २२ जानेवारीला पिंपरी-चिंचवडमधील बांधवांनी आपल्या नजीकच्या कोणत्याही मंदिरात जाऊन पवित्र अक्षता अर्पण काराव्यात. तसेच घरोघरी “श्रीराम ज्योती” लावून हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन शंकर जगताप यांनी नागरिकांना केले.
भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपळेगुरव, सांगवी, संत तुकारामनगर, कासारवाडीसह अन्य भागात घरोघरी जाऊन पवित्र मंगल अक्षता व निमंत्रण पत्रिकांचे वाटप केले. यावेळी सांगवीतील स्वयंसेवक परेश नेमाडे, प्रदीप बडे, संजय लोहकरे, किशोर खोत, विशाल सांगळे, संतोष कुलकर्णी, सागर पवार, जतीन गाजरे, सुधाकर वाचपे, शरद पवार, संत तुकारामनगरमधील स्वयंसेवक ओंकार शिंदे, चंद्रशेखर, विशाल मासुळकर, राजू चौधरी, संदीप जाधव, सतीश नागरगोजे, आशिष नागरगोजे, राहुल खाडे, सर्वेश देसाई, गोविंदा गायकवाड, रोनित काटे, राहुल सणस, सागर सणस, प्रतीक पवार, महेश देशपांडे, ललित देसाई, सागर गायकवाड, वसंत शेवडे, मंगेश येरूनकर, साहिल शहा आदी उपस्थित होते.
अयोध्येत २२ जानेवारी रोजी हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक असलेला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. यादिवशी थोड्या मंगल अक्षता आपल्या घरातील देव्हाऱ्यात वहाव्यात आणि थोड्या अक्षता जवळच्या मंदिरात जाऊन देवासमोर ठेवून त्यांची पूजा करावी. प्रत्येक मंदिरात २२ जानेवारी रोजी धार्मिक कार्यक्रम घ्यावेत. मंदिरे सजवावीत. भजन, कीर्तन, पाठ यामध्ये सामील व्हावे. गोडधोड जेवण करावे. घरासमोर रांगोळी काढावी. घरोघरी दिवे लावावेत. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाने या उपक्रमांमध्ये सहभावी व्हावे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या २२ जानेवारी रोजी घरोघरी श्रीराम ज्योती लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत “श्रीराम ज्योती लावूया, आपले घर उजाळूया”, असे आवाहन शंकर जगताप यांनी केले आहे.