संभाजी भिडेंच्या ‘त्या’ विधानावर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना राग अनावर; म्हणाले..
मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्टपिता महात्मा गांधी यांच्या विषयी एक वादग्रस्त विधान केलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानावर समाजातील विविध घटकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावरून महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तुषार गांधी म्हणाले की, संभाजी भिडे जे बोलले, ते इतकं घृणास्पद नव्हतं जितकं त्यांच्यासमोर बसलेल्या प्रेक्षकांनी हसून त्या विधानाचं समर्थन करणं घृणास्पद होतं. या राज्याच्या मानसिकतेची विकृतता किती झालीये याचं हे उदाहरण आहे. आपल्याला त्याची चिंता असायला हवी की आपला समाज इतका विकृत कसा झाला की विचारांचा द्वेष विचारांनी न करता त्या विचाराच्या व्यक्तीच्या आई-वडिलांबाबत तुम्ही अपमानजनक बोलता.
हेही वाचा – कुणाल आयकॉन येथील रस्त्याचा अद्ययावत पध्दतीने विकास
महाराष्ट्राची ओळख पुरोगामी होती. पण तिथे नारीशक्ती इतकी लुप्त कशी झाली की एका आईला इतका मोठा अपमान केला जात असताना महाराष्ट्रात एकही महिला याविरोधात आवाज उठवत नाही, एकाही महिलेला स्वत:चा अपमान होतोय असं वाटत नाही. ही चिंतेची गोष्ट आहे. हे एका कुटुंबापुरतं मर्यादित नाहीये, अशी शब्दात तुषार गांधी यांनी भिडेंच्या त्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?
मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.