कोकण, सातारा, कोल्हापूरसह मराठवाड्याला यलो अलर्ट, विजांसह वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टी, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) १९ जुलै रोजी तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
या भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत पावसाचा जोर हळूहळू कमी होईल, परंतु तळ कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
IMD च्या ताज्या उपग्रह निरीक्षणांनुसार, कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवर तसेच उत्तर गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यांवर आणि पूर्व विदर्भात सध्या पावसाचे काळे ढग दाटले असून, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि वादळी वारे (३०-४० किमी/तास) येण्याची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर अकोला, अमरावती या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने १९ जुलै साठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार सरी आणि वादळी वारे अपेक्षित आहेत. मराठवाड्यातील बहुतांश भागात हलक्या सरींची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक पावसाचा अंदाज आहे.
पुढील तीन दिवसात पावसाचा जोर हळूहळू कमी होईल. तळ कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २१ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भाग वगळता इतर ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.





