जेजुरीच्या खंडेरायाची चंपाषष्ठी आणि तळी उचलण्याचे महत्व काय? जाणून घ्या..

Jejuri Khandoba : मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रात जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो. या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात. त्यामध्ये ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ असतात. तसेच गव्हाच्या लोंब्या, हुरडा, तीळ आणि गूळ हे पदार्थ एकत्र करून त्याचा दिवा करतात.
या दिवशी महानैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात. एका ताम्हनात पाने, पैसा, सुपारी, भंडार व खोबरे हे पदार्थ ठेवून येळकोट असा उद्घोष करून ते ताम्हन तीनदा उचलणे यालाच ‘तळी भरणे’ म्हणतात. ताम्हण उचलताना प्रत्येकवेळी भंडार भरलेली खोबऱ्याची वाटी मोडतात. मग दिवटी बुधली घेऊन आरती करतात.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण
मग जेजुरीच्या दिशेने चार पावले जाऊन देवाला ओवाळतात व भंडार उधळून पुनश्च जागेवर येतात. लाक्षणिक अर्थाने याला ‘जेजुरीला जाऊन येणे’ असे म्हणतात. नंतर दिवटी दुधाने विझवतात. तसेच चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रात जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो. मणि आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. या घटनेचे स्मरण रहावे म्हणून चंपाषष्ठीला हा उत्सव साजरा करतात.





