‘या’ 3 महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना ‘टोलमाफी’; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक वाहन धोरणाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांना मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पथकर (टोल माफी) देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ ला मान्यता देण्यात आली. हे धोरण २०३० पर्यंत लागू राहील. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अशा १ हजार ९९३ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतूदीसही यावेळी मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन व वापरास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. यामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर व विक्रीमध्ये मोठी वाढ अपेक्षीत आहे.
हेही वाचा – अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीला विक्रमी भाव; १६ हजार रुपयांपर्यंत मिळाला दर
या धोरणांतर्गत तीन महामार्गांवर प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना व बसेसना पथकर पूर्ण माफ करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अन्य राज्य व राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना पथकरात पन्नास टक्के इतकी सवलत देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.
या धोरणांतर्गत राज्यात विक्री व नोंदणी झालेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मोटार वाहन करातून तसेच नोंदणी प्रमाणपत्राच्या किंवा नुतनीकरण शुल्कातून माफी देण्यात आली आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार होण्यासाठी राज्यामध्ये चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा भक्कम विकास करण्यात येणार आहे.