यंदा अटी-शर्तींच्या निकषानंतरच कर्जमाफी

Loan waiver : राज्य शासनाकडून यापूर्वी शेतकऱ्यांना दोनदा कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी प्रथम थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या घोषणा करण्यात आली. यंदा मात्र ही घोषणा करण्यापूर्वी प्राधान्याने अटी-शर्ती व निकष निश्चित केल्या जाणार आहेत.
नंतरच सविस्तर कर्जमाफीची घोषणा होणार आहे. त्यासाठी विविध विभागांकडून माहिती जमा करण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना याचा फायदा अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील जिल्हा बँकांसह राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. त्यामध्ये पीक कर्जासह शेतीपूरक कर्ज, अल्प, मध्यम मुदत व दीर्घ मुदतीचे कर्जसुद्धा शेतकरी घेत असतात.
हेही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांचे घरभाडे वाढले; निवासस्थान सेवाशुल्कात दुपटीने वाढ
खरिपात विशेषतः हंगामात खते, बि-बियाणे, औषधांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना बँकांकडील पीक कर्जाचाच मोठा आधार राहतो. मात्र, शेतमालाच्या दरात घसरण होणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये उत्पादनात घट येणे व अन्य कारणांमुळे शेतकरी घेतलेल्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकत नाहीत, अशी स्थिती निर्माण होते.
यंदा प्रस्तावित कर्ज निवारण योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाआयटीच्या पोर्टलकडे देण्यात आली आहे. या पोर्टलवर ऑनलाइन थकीत कृषी कर्जाची माहिती भरण्याच्या सूचना सर्व बँकांना शासनाने दिलेल्या आहेत. राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत, खासगी व व्यापारी बँका मिळून 28 बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती प्राधान्याने भरण्यात येत आहे.




