Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर, नेटके व आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन असून या महोत्सवामुळे पर्यटनवाढीला निश्चितपणे चालना मिळेल व या पर्यटन उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित दि. 2 ते 4 मे या कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उदघाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार तुकारात ताके, पर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, ब्रॅन्ड अँब्यासिटर मृणाली देव- कुलकणी, नवेली देशमुख, जपानचे कॉन्सुलेट जनरल यमाशिता सान आदी उपस्थित होते.

महाबळेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. याला ऐतिहासिक वारसा आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाबळेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा महापर्यटन उत्सव होत आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई अत्यंत उत्साही असून अतिशय कमी दिवसात या महोत्सवाची केलेली तयारी अत्यंत दर्जेदार आहे. महापर्यटन उत्सवात विविध साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शास्त्रप्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, साहसी खेळांचे उपक्रम, हेलिकॉप्टर यासह विविध उपक्रम पर्यटकांसाठी राबविण्यात येत आहेत. फूड फेस्टिवलमध्ये विविध चवदार पदार्थ, मिलेटचे पदार्थ, औषधी पदार्थ यांचा समावेश आहे. बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालांचे ब्रॅन्डीग व्हावे यासाठी कायम स्वरुपी वितरण व्यवस्था निर्माण केल्यास लाडक्या बहिणी लखपती होतील, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढेल. सातारा जिल्ह्याला पर्यटन हब बनविण्यासाठी जाणीवपूर्वक अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत. बामणोली खोऱ्यात केबल पुल बांधण्यात येत आहे. त्यावर विव्हिंग गॅलरी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पुल, तापोळा तेटली येथे होणारा पुल या सर्वांमुळे पर्यटन वाढीला मदत होणार आहे. लोकाभिमुख, कल्याणकारी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. शेतकऱ्यांसाठी किफायतशिर ठरणाऱ्या बांबु लागवडीला चालना दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी अनेक राज्ये पर्यटन उद्योगावर चालतात आपल्याकडेही पर्यटनाला खूप वाव आहे. त्याची व्याप्ती अधिक वाढविल्यास पर्यटनाला चालना मिळेल, आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरचे नाव जगभरात चमकले पाहिजे यासाठी काम करा, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा –  अखेर पुणे शहरात पाणीकपात: कात्रज, कोंढवा, सिंहगड रस्ता भागात कपात

पर्यटन तथा पालकमंत्री देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याचे ब्रॅन्डींग जगभरात करण्यासाठी या महापर्यटन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोसत्वाच्या आयोजनासाठी जिल्ह्यातील मंत्री महोदयांनी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. नटलेले, सुशोभित महाबळेश्वर पाहयला मिळत आहे याचा मनस्वी आनंद आहे.

ग्रामविकास मंत्री गोरे यांनी महापर्यटन उत्सवाला शुभेच्छा देत असताना या उपक्रमाबद्दल आणि पर्यटन मंत्री देसाई यांच्या कलपकतेबद्दल कौतुक केले. महाबळेश्वर, कोयनेचा परिसर अत्यंत सुंदर आहे. कोकणाला जोडणारा पुल तयार होत असल्याने याचा फायदा पर्यटन वाढीला निश्चतपणे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फुड फेस्टिवल फ्ली बाजार, कीड्स झोन, वेण्णा लेख येथील तरंगता बाजार, प्रतापसिंह उद्यान आदी ठिकाणी भेटी दिल्या. गोल्फ क्लब येथे उभारण्यात आलेल्या टेंट सिटीचे उद्घाटन केले. सुरक्षा दलाचा शुभारंभही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि राज्यातील पर्यटनाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ या बहुउद्देशीय उपक्रमाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाबळेश्वर येथे उत्साहात पार पडले.

या उपक्रमात “पर्यटन मित्र” म्हणून कार्यरत असणारे प्रशिक्षित तरुण पर्यटकांना नुसतेच मार्गदर्शन करणार नाहीत, तर त्यांना आवश्यक त्या वेळी तत्काळ मदत, माहिती आणि सुरक्षेचा आधारही देतील. सुरुवातीला महाबळेश्वर येथे २५ ‘पर्यटन मित्र’ कार्यरत झाले असून, लवकरच संपूर्ण राज्यात या योजनेचा विस्तार होणार आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, “पर्यटन फक्त निसर्ग दर्शनापुरते मर्यादित नाही. ते सुरक्षित असेल, तरच पर्यटकांचा विश्वास जिंकता येतो. त्यासाठीच हा उपक्रम सुरू केला आहे.”

ही योजना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राबवली जात असून राज्य सुरक्षा महामंडळ आणि माजी सैनिक महामंडळ यांचा तांत्रिक सहभागही लाभत आहे. त्यामुळे या दलातील सदस्य केवळ शिस्तबद्ध नसून, माहितीपूर्ण आणि सेवाभावीही असतील.

महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उदघाटनामुळे राज्याच्या पर्यटन विकासात नवा अध्याय सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button