‘पालकमंत्रिपदावर दिल्लीतून स्थगिती आणली, मुख्यमंत्री परदेशात असताना मोठी खेळी’; संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ

मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारामध्ये सातत्याने नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात पालकमंत्रिपदांची घोषणा करण्यात आली. यावरुन अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची निवड झाल्यानंतर भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले होते. तर नाशिकमध्येही दादा भुसे समर्थकांमध्ये नाराजी होती. यानंतर नवीन जीआर काढत नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपद निवडीला स्थगिती देण्यात आली आहे. आता खासदार संजय राऊत यांनी यावरुन गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पालकमंत्रीपदाच्या निवड आणि त्यानंतर दिलेल्या स्थगितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. पालकमंत्रिपदावर दिल्लीतून स्थगिती आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना मोठी खेळी करण्यात आली, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत लष्कराचे संचलन
पालकमंत्रीपदासाठी लढाई हे बिनडोकपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. मुख्यमंत्री परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्रीपदावर स्थगिती आणली. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. पालकमंत्री पदासाठी टायर जाळले गेले. हे धमक्या देणे सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले.





