महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये धो-धो कोसळणार; हवामान विभागाचा मोठा इशारा

Weather Forecast : देशभरात उष्णतेची तीव्र लाट सुरू असतानाच आता अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले असताना, भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत देशातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने ईशान्य भारतातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. 17 मे रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तर 18 मे रोजी आसाम आणि मेघालय मध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय 17 ते 23 मे या कालावधीत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये 17 ते 19 मे दरम्यान पावसाची शक्यता आहे. तसेच केरळ आणि माहे येथे 17 ते 21 मे या कालावधीत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कर्नाटकमधील आतील भागात 17 आणि 18 मे रोजी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. किनारी आंध्र प्रदेशात 20 आणि 21 मे रोजी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश मध्येही पुढील काही दिवसांत हवामान बदलण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 20 ते 23 मे दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज असून, हिमाचल प्रदेशात 19 ते 23 मे दरम्यान मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मध्य भारतातील काही भागांमध्येही हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ भागात 17 मे रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील काही भागांमध्येही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने नागरिकांना वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.





