‘नारायण राणे दोन महिन्यांनी तिहार तुरूंगात जातील’; संजय राऊतांचं मोठं विधान

मुंबई | सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आम्ही काम करतो आहोत. आघाडी धर्म आम्ही सगळेच पाळतो आहोत. काँग्रेसही पाळतं आहे आम्हीही पाळतो आहोत. आता कामाला लागलं पाहिजे. रामटेकमध्ये आमचा उमेदवार होता तिथे त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काही बोललो का? आता तिथे काम करु आम्ही त्यांचं. काँग्रेसच्या नेत्यांना सांगलीत भेटणार आहोतच. विश्वजीत कदम, विशाल पाटील आमचेच आहेत.
हेही वाचा – महसूल संकलनाची विक्रमी 112 टक्के उद्दिष्टपूर्ती
आघाडीत प्रत्येक पक्षाला वाटतं की हा मतदारसंघ आपल्याकडे रहावा. मात्र आघाडीत जागा इकडे तिकडे होत असतात. भाजपाशी युती असतानाही असं झालं आहे. इथे तीन पक्ष आहेत. विशाल पाटील आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील यापुढे संसदेत कसे जातील याची काळजी शिवसेना घेईल. आम्ही आमच्या मतदारसंघात चंद्रहार पाटील यांचा प्रचार करायला आलो आहोत. विशाल पाटील संसदेत कसे जातील ते आम्ही पाहू. विमानतळाचा प्रश्न सोडवू हे मिरजेच्या सभेत चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंना अटक होईल, असं नारायण राणेंनी वक्तव्य केलं आहे. यावरून विचारलं असता संजय राऊत म्हणाले, मग नारायण राणे कुठे असतील? दोन महिन्यांत सत्ता आमची येते आहे. त्यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यात ते कुठे असतील तिहार जेलमध्ये. तसंच नवनीत राणांबाबत मी काहीही बोलणार नाही. काही लोकांविषयी मत न व्यक्त करणंच योग्य असतं, असंही संजय राऊत म्हणाले.





