आसाममध्ये पुराची परिस्थिती; एकूण 56,64,499 जणांना पुराचा फटका तर, 93 जणांचा मृत्यू

कोरोना व्हायरसचे महासंकट असताना आता आसाममध्ये पुराची परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीमुळे 26 जिल्ह्यातील एकूण 56,64,499 जणांना फटका बसला आहे. तसेच 93 जणांचा पुरामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. तसेच नागरिकांसाठी 587 रिलिफ कॅम्पची उभारणी करण्यात आली आहे. तर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आसाम मधील पुर परिस्थितीमुळे बारपेटा, डिब्रुगढ, कोकराझर, बोंगाईगाव आणि तिंसिकुया येथे सर्वाधिक फटका बसला आहे.
ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने 2525 गावात पाणी शिरले आहे. यामुळे बहुतांश शेतीचे नुकसान झाले असून घरे सुद्धा पाण्याखाली गेली आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ही पुराचे पाणी शिरल्याने 120 जनावरांचा बळी गेला आहे. तर 147 जनावरांना वाचवण्यात आले आहे. राष्ट्रीय उद्यानाचा 80 टक्के भाग पाण्याखाली गेला आहे
तसेच यंदाच्या वर्षी असम मध्ये पुराची परिस्थिती अधिक वाढली आहे. तर महिन्यातील तिसऱ्या वेळेस काझीरंगा पुरामुळे पाण्याखाली गेले आहे.
एसडीआरएफ, एनडीआरफ यांच्याकडून आतापर्यंत 400 हून अधिक लोकांची पुरातून सुटका करण्यात आली आहे. पुरामुळे राज्यातील रस्ते आणि पुल ही पाण्याखाली गेले आहेत. केंद्राकडून बुधवारी आसामच्या नागरिकांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात 346 कोटी रुपये मदतनिधी जाहीर केला आहे. तसेच आसामसह बिहार येथे ही पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे बिहार मधील 5 लाखांहून अधिक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील जवळजवळ 10 पेक्षा अधिक जिल्ह्यातील परिस्थिती पुरामुळे नाजूक झाली आहे. याच दरम्यान, बिहार मधील गोपालगंज येथील अजून एक पूल वाहून गेला आहे. पुर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





