आषाढीवारीच्या पूर्वतयारीचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून आढावा
रस्ते व पालखीतळ दुरुस्तीचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश

पुणे | यंदाच्या आषाढीवारीदरम्यान वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, दुरुस्त रस्ते आणि पालखीतळ यांची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी पालखी मार्गावरील रस्ते आणि पालखीतळ दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, रस्ते दुरुस्तीच्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कामांना मान्यता आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढीवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह सातारा, सोलापूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्गावर आणि विसाव्याच्या जागांवर स्वच्छता राखण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. फिरती शौचालये आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची पुरेशी व्यवस्था करावी. टँकरमधील पाण्याची शुद्धता तपासावी आणि पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरणही काटेकोरपणे करावे.” त्यांनी पालखी मार्गावरील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता व अन्न शुद्धतेची खातरजमा करण्याचे निर्देश दिले. पंढरपूर शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनुष्यबळ आणि वाहनांची व्यवस्था करण्याबरोबरच ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त यंत्रणा तयार ठेवावी, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : Gold Price | सोन्याचे दर आणखी घसरले, जाणून घ्या आजचा भाव..
त्यांनी पालखी सोहळ्यासाठी पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही दिली. ग्रामपंचायतींना आगाऊ निधी देण्याची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे नियोजनाची माहिती दिली. “स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, प्रथमोपचार पेट्या, निवारा केंद्र, हिरकणी कक्ष आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,” असे त्यांनी नमूद केले. सर्व विभागांनी समन्वय ठेवून सूचनांचे पालन करावे आणि पाण्याचे टँकर वेळेत पोहोचतील याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. संबंधित जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती सादर केली. आषाढीवारी सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.