मुंबईकरांनो, उद्यापासून मोठा बदल; आताच वाचा नाहीतर ३ महिन्यांसाठी परवाना होईल रद्द

मुंबई : हेल्मेटसक्ती केली असली तर रोज अनेकजण विना हेल्मेटच प्रवास करताना दिसतात. पण आता उद्यापासून असं चालणार नाही. कारण, हेल्मेटविना प्रवास करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईतील तब्बल ५० वाहतूक पोलीस चौक्या गुरुवारपासून (९ जून) दुचाकीस्वार आणि हेल्मेटविना प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
नुकतेच, मुंबई वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट अनिवार्य करणारी अधिसूचना जारी केली होती. इतकंच नाहीतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला होता. पण तरीही अनेक प्रवासी विना हेल्मेट प्रवास करताना दिसतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा शहरांमध्ये कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारपासून जर दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलं नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यासाठी कारवाईत परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करा आणि ५०० रुपयांचा दंड घ्या, असा आदेश सर्व ५० वाहतूक चौकींना देण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त रकतिलक रोशन यांनी सांगितले. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी मुंबईकरांना हेल्मेटबाबतच्या नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं असून उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्यापासून दुचाकीवर बाहेर पडणार असाल तर हेल्मेट घालण्यासाठी विसरू नका.





