‘मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : मराठी भाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता, अभिमान आहे. ही भाषा संपली तर आपले अस्तित्व संपेल याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. मराठी केवळ संवादाची भाषा न राहता ती रोजगाराची भाषा झाली पाहिजे. तिचे व्यावसायिक महत्त्व टिकवून ठेवत मराठीचे वैभव, दरारा आणि मराठीचा दिमाख कायम ठेवणे हे आपले केवळ कर्तव्य नसून ती अत्यंत पवित्र अशी जबाबदारी आहे. या साहित्य संमेलनाला शासनाने 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यापुढेही अशा साहित्य संमेलनांना निधी कमी पडणार नाही, हे पाहणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सातारा येथे १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप कार्यक्रम उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, आमदार महेश शिंदे, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उद्योजक, मंडळाचे कार्यवाहक सुनिताराजे पवार व संमेलनाचे संरक्षक फरोख कूपर आदी उपस्थित होते.
साताऱ्याच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी झाली. त्या पवित्र भूमीत ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम नाहीतर मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा सांस्कृतिक आत्मविश्वासाचा आणि विचारस्वातंत्र्याचा उत्सव आहे. हे संमेलन साहित्याचा आणि मराठी भाषेचा महाकुंभ आहे. मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा संगम आहे. या संमेलनाला साताऱ्याच्या कंदीपेढ्याचा गोडवा लाभला आहे. इथल्या लोकांच्या हृदयात प्रेमाची स्ट्रॉबेरी भरलेली आहे. शंभरावे साहित्य संमेलनदेखील जोरदार झाले पाहिजे. त्यालाही शासन काही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हेही वाचा – आयोगाचे ४० ॲप्स आता एकाच ठिकाणी! मतदारांचे काम होणार सोपे; घरबसल्या मिळणार ‘या’ सुविधा
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्र शासनाचे आभार मानले. ते म्हणाले, मराठी भाषेचे व्यावसायिक महत्त्व टिकवून ठेवायचे असेल तर मराठी साहित्य, नाटक अशा सर्व माध्यमांना आपण मोठे केले पाहिजे. नव्याने येणाऱ्या साहित्यिकांना मोठे करण्याची जबाबदारी मराठी भाषिकांची आहे. मराठी केवळ ही संवादाची नव्हे तर अर्थाजनाची, रोजगाराची भाषा झाली पाहिजे. मराठी बोलणारा, ऐकणारा, मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज टिकविला, वाढविला पाहिजे. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती अजिबात होणार नाही. मराठी भाषेचा सन्मान वाढविला जाईल. राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांच्या आवारांमध्ये मराठी ललित पुस्तकांच्या विक्रीसाठी 50 टक्के सवलतील स्टॉल उपलब्ध करुन दिले जातील. लेखन आणि प्रकाशन व्यवसायावर लागू असलेला कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी त्यांनी ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाद्दल आयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.




