‘राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करायच्या याबाबतचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती महाराष्ट्राचा आत्मा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
भाषाविषयक धोरण स्पष्ट करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात मराठी भाषेची सक्ती असेल; मात्र इतर कोणत्याही भारतीय भाषेची सक्ती केली जाणार नाही. इतर भाषा ऐच्छिक असतील. यासंदर्भात अभ्यासासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, तिचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. मृदुला गर्ग, स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ९९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नगराध्यक्ष अमोल मोहिते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, उद्योजक व संमेलनाचे संरक्षक फरोख कूपर, जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – बिनविरोध उमेदवारांची होणार चौकशी; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार करून मराठी भाषेला प्रशासकीय दर्जा दिला, याची आठवण करून देत मुख्यमंत्री म्हणाले की, मराठीच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून, आता मराठीच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने सकारात्मक पावले उचलली जात आहेत. मात्र, केवळ दर्जा मिळवणे पुरेसे नसून मराठीला व्यापक लोकमान्यता मिळवून देणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जेएनयू’सारख्या संस्थांमध्ये मराठी अध्यासन सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी अधोरेखित केले
मराठी साहित्य क्षेत्रात कोणताही हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, साहित्य निर्मिती ही समाजाच्या जाणिवा विस्तारण्यासाठी असते. त्यामुळे टीका आणि गौरव या दोन्हींतून सुधारण्याचा मार्ग शोधला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
साताऱ्याच्या साहित्यिक परंपरेचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजवर झालेल्या ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांपैकी सर्वाधिक सहा संमेलनांचे आयोजन सातारा जिल्ह्यात झाले असून, सर्वाधिक १७ संमेलनाध्यक्ष हे सातारा जिल्ह्याचे भूमीपुत्र होते.
संमेलनाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा, मावळा फाउंडेशन, सातारा तसेच सहभागी सर्व संस्थांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्याला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संमेलनाच्या उद्घाटक डॉ. मृदुला गर्ग यांनी राष्ट्रीय स्तरावरील मराठी साहित्याचा आढावा घेताना कवी नामदेव ढसाळ, मल्लिका अमर शेख, उर्मिला पवार, शरणकुमार लिंबाळे, विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांच्या साहित्य व नाटकांचा गौरव केला.




