लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीचा वेग मंद; १ कोटीहून अधिक लाभार्थींची प्रक्रिया प्रलंबित

मुंबई : महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले असले तरी राज्यातील १ कोटीहून अधिक महिलांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी न झाल्यास लाभार्थींना योजनेबाहेर ठेवले जाणार का, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे.
महिला आर्थिक सबलीकरण आणि स्वावलंबनाच्या उद्देशाने सुरू केलेली ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे लाभार्थींना प्रक्रियेमुळे वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, सध्या १० दशलक्षाहून (१ कोटी) अधिक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे १८ नोव्हेंबरपर्यंत सर्वांची पडताळणी पूर्ण होणे कठीण असल्याचे चित्र दिसत असून, सरकार ई-केवायसीसाठी मुदतवाढ जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा – बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश’ राजच; सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली, 20 तारखेला शपथविधीची शक्यता?
योजनेअंतर्गत प्रतिमाह मिळणारी १,५०० रुपयांची आर्थिक मदत ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने महिला ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी केंद्रांवर गर्दी करताना दिसत आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठीची ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी असून काही मिनिटांत पूर्ण होते. लाभार्थींना जवळच्या अंगणवाडी केंद्रात, सेतू केंद्रात किंवा तहसील कार्यालयात जाऊन ही पडताळणी करता येते. राज्यातील एकूण २.५ कोटी नोंदणीकृत महिलांपैकी केवळ १.३ कोटींनीच ई-केवायसी पूर्ण केल्याचे समोर आले आहे.




