कोकणातील या रेल्वेगाड्याच्या कालावधीत वाढ; कोकणातील प्रवाशांना दिलासा

मुंबई : कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्याची खंत प्रवाशांद्वारे सातत्याने व्यक्त केली जाते. अनेक विशेष रेल्वेगाड्या देखील काही मर्यादित कालावधीसाठी चालविण्यात येतात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यामध्ये गर्दीचा ताण वाढतो. याकारणास्तव कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी या रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही रेल्वेगाडी १५ जानेवारीपर्यंत चालवण्यात येणार होती. परंतु, आता ही रेल्वेगाडी १२ फेब्रुवारीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत असेल.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नाताळ आणि नववर्षानिमित्त गाडी क्रमांक २२११५/२२११६ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमळी दरम्यान साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येत होती. १८ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत ही रेल्वेगाडी चालविण्याचे नियोजन होते. परंतु, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी, या रेल्वेगाडीला १२ फेब्रुवारीपर्यंत चालविण्याचे नियोजन केले आहे.
हेही वाचा – ‘मागची पाने आम्ही चाळली तर अजित दादांना बोलता येणार नाही’; चंद्रशेखर बावनकुळे
गाडी क्रमांक २२११५ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमळी साप्ताहिक रेल्वेगाडी एलटीटीवरून दर गुरुवारी रात्री १२.५० वाजता सुटते. त्यानंतर मडगावला सकाळी ११.१५ वाजता पोहोचते. तर, गाडी क्रमांक २२११६ करमळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) करमळी येथून दुपारी १.४० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२.१० वाजता एलटीटीला पोहचते. ही रेल्वेगाडी मुंबई- गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर आहे. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, करमळी आणि मडगाव येथे थांबे आहेत. तसेच या रेल्वेगाडीला प्रथम वातानुकूलित डबा, द्वितीय वातानुकूलित डबा, तृतीय वातानुकूलित डबा, पॅन्ट्री कार अशी डब्यांची संरचना आहे. ही रेल्वेगाडी उशिराने धावते. तसेच शौचालयात पाणी नसणे, अस्वच्छता रेल्वेगाडीत असल्याच्या तक्रारी प्रवाशांद्वारे सातत्याने केल्या जातात.
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमळी रेल्वेगाडीला २०२१ मध्ये लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) जोडण्यात आले. एलएचबी डबे हे आधुनिक, स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले प्रवासी रेल्वे डबा आहेत. या डब्यांमध्ये अँटी-क्लाइंबिंग उपकरणे आणि अग्निरोधक साहित्य यासारख्या अत्याधुनिक सुरक्षा सुविधा दिल्या जातात. जुन्या पद्धतीच्या आयसीएफ डब्यांच्या तुलनेत या डब्यांचा कार्यरत वेग अधिक आहे. आयसीएफ डब्यांचा वेग १४० किमी प्रतितास आहे. तर, एलएचबी डब्यांचा वेग १६० किमी प्रतितास असून हा वेग २०० किमी प्रतितासापर्यंत वाढविता येतो. भारतीय रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वेगाड्यांचे आयसीएफ रेल्वेगाड्यांच्या जागी एलएचबी डबे जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.




